


कोपरगाव प्रतिनिधी
परतीच्या पावसाने विलंब केल्याने कांदा रोपे टाकण्यास उशीर झाल्याने यावर्षी कांदा पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे चित्र आहे.
यावर्षी पावसाचे अतिरिक्त प्रमाण व उशिरा परतल्याने शेतकऱ्यांना वेळेवर कांदा बियाणे टाकता आले नाही. पावसाने उघडीप दिल्यानंतर कांदा बियाणे टाकण्याची वेळ निघून गेली. त्यामुळे आता कांदा बियाणे पेरणी केल्यास हंगामास उशीर होऊन मार्च मध्ये पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने कांदा बियाणे पेरणीस सुरवात केली आहे. त्यामुळे कांदा लागवडीवर होणारा खर्च कमी झाला. जेऊर कुंभारी परिसरातील माजी सरपंच यशवंत आव्हाड,गौतम बँकेचे संचालक धोंडीराम वक्ते, प्रविण आव्हाड
यांच्या सहा एकर शेतामध्ये यांत्रिकी साधनांच्या साह्यांने कांदा पेरणी पसंत केली आहे. कांदा बियाणे यावर्षी १० हजार रुपये पायली गेला आहे. कांदा बियाण्याचा एवढा भाव वाढल्यामुळे बियाण्यापासून रोपे तयार करून लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना काही परवडण्यासारखा नाही. रोपे टाकून कांदा लागवड करण्यापेक्षा कांदा पेरणीकडे लक्ष दिले जात आहे. या अगोदर चांदेकसारे, जेऊरकुंभारी, डाऊच खुर्द, वारी, पोहेगाव या भागातील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली आहे. त्यामुळे यावर्षी जेऊरकुंभारी पंचक्रोशीत ६० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा पेरणी केली. कांदा पेरणीतून एकरी दोनशे क्विंटलपर्यंत उत्पन्नाची अपेक्षा आहे असे शेतकरी माजी सरपंच यशवंत आव्हाड, गौतम बँकेचे संचालक धोंडीराम वक्ते, प्रविण आव्हाड यांनी सांगितले.


