

ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी व डाऊच खुर्द गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काल दि.२६ जुलै रात्री जेऊर कुंभारी गावातील प्रशांत गिरमे यांच्या घरासमोर रात्री २ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला. गिरमे यांच्या अंगणात गाई, शेळ्या व कुत्रे हे पाळीव प्राणी होते. कुत्र्याच्या भुंकण्याने गिरमे यांना जाग आली, त्यांनी खिडकीतून बिबट्या दिसल्याने त्यांनी आरडा ओरडा करताच बिबट्या तिथून पसार झाला. पण बिबट्याचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे. या संदर्भात मा.उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी वनविभागाचे अधिकारी सोनवणे मॅडम यांना कळवले मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
जेऊर कुंभारी गावात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा संचार असल्याने शेतकरी, शेतमजूर, कारखान्यातील कामगार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेऊर कुंभारी गावातील चव्हाण वस्ती, हरीसन ब्राॅच, पांढरे वस्ती या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने यासंदर्भात वन विभागाला जेऊर कुंभारी गावचे सरपंच सुवर्णा पवार, डाऊच खुर्द गावाचे सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच ताराचंद लकारे, जालिंदर चव्हाण, यशवंत आव्हाड, पो.पा. बाळासाहेब गायकवाड, पाटीलबा वक्ते, कल्याण गुरसळ, प्रदीप गायकवाड, दिगंबर पवार यांनी वन विभागाला वेळोवेळी कळवुनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. लोकांचे प्राण गेल्यावर वनविभाग सावध होणार की काय? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. बिबट्या डाऊच खुर्द गावातील गुरसळ वस्ती येथेही निदर्शनास आला आहे. सध्या शेतीत शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक केलेले आहे रात्रपाळी असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी व शेतमजूर जाण्यास तयार नाही त्यामुळे शेती पडीत पडते की काय असा प्रश्न दोन्ही गावांमध्ये निर्माण झाला आहे. जर गावातील नागरिकांना काही इजा झाली तर याला सर्वस्वी वनखाते, वनविभाग अधिकारी जबाबदार असेल असे दोन्ही गावच्या नागरिकांनी सांगितले. या बिबट्याचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सुवर्णा पवार, डाऊच खुर्द गावचे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच ताराचंद लकारे, मा.उपसरपंच जालिंदर चव्हाण, मा.उपसरपंच यशवंत आव्हाड, पो. पा. बाळासाहेब गायकवाड ,पाटीलबा वक्ते, कल्याण गुरसळ, प्रदीप गायकवाड,
दिगंबर पवार आदीनी वन विभागाला उपोषणाचा इशारा दिला आहे.


