
कोपरगाव प्रतिनिधी
पाणी पुरवठ्याचे उत्तम नियोजनाच्या बाबतीत नेहमीच बारामती आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे उदाहरण दिले जाते. त्याच धर्तीवर कोपरगाव शहरातील नागरिकांना देखील नियमित व मुबलक पाणी देण्यासाठी ५ नं. साठवण तलवाच्या कामाला गती देण्यासाठी मी स्वत: पंधरवड्याला त्याचा आढावा घेणार आहे. व मुख्याधिकाऱ्यांना देखील दर आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ५ नं. साठवण तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण होवून नागरिकांना लवकरात लवकर पाणी पुरवठा कसा सुरु होईल हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर आहे. त्यामुळे उत्तम पाणी पुरवठा व्यवस्था म्हटले की, ज्याप्रमाणे बारामती, श्रीरामपूरचा उल्लेख होतो त्याप्रमाणेच भविष्यात बारामती, श्रीरामपूर प्रमाणेच कोपरगावचे देखील नाव घेतले जाईल असा विश्वास श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून ना. आशुतोष काळे यांनी अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल १३१.२४ कोटी रुपये निधी आणला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मोठी मदत झाली असून लक्ष्मी कन्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने नुकतेच ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचा सर्व्हे सुरु केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या सुरु झालेल्या कामाची माहिती देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत कोपरगाव शहराचा ज्वलंत झालेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या संघर्षातून व प्रामाणिक प्रयत्नातून मिळालेल्या १३१.२४ कोटी निधीतून प्राथमिक स्वरूपातील कामास प्रारंभ झाला असून एक महिन्याच्या आत हा सर्व्हे पूर्ण होईल. या योजनेत एकूण ४ पाण्याच्या टाक्या असून याखेरीज एक मुख्य टाकी देखील असून लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. हा तलाव पूर्ण सिमेंट कॉंक्रिट मध्ये बांधण्यात येणार असून पाणी गळती होवू नये यासाठी खालच्या बाजूस ‘जिओ मेमरेन’ नावाची फिल्म टाकण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा तलाव फक्त बारामती आणि श्रीरामपूर या ठिकाणी असून आता कोपरगावात अशा प्रकारचा तलाव तयार होणार आहे. कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे मोठे समाधान असून ५ नं. साठवण तलाव, वितरण व्यवस्थेबरोबरच जुन्या चारही तलावांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हि योजना यशस्वीपणे सुरु राहील त्यासाठी विद्युत खर्च कमी करून सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी १.९३ कोटींचा सोलर प्लांट देखील उभारण्यात येणार आहे.
योजना पूर्ण करण्याचा कालावधी जरी दोन वर्षाचा असला तरी दोन वर्षाच्या आत या साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण कसे होईल यासाठी माझे बारीक लक्ष राहणार आहे. मागील अनेक वर्षापासून पाण्यासाठी कष्ट सोसणाऱ्या शहरवासियांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेच यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न राहतील. कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे देखील याबाबत आढावा घेवून मला माहिती देतील अशा सूचना त्यांना केल्या असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,दिनार कुदळे, कृष्णा आढाव, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सुनील बोरा, राजेंद्र फुलफगर,सागर पाटील, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, नगरपरिषद अभियंता सुनील ताजवे,स्थापत्य अभियंता हर्षवर्धन सुराळकर,मानवसेवा अभियंता गणेश म्हस्के, राहुल कवडे, सुनील मगूकीचा आदी उपस्थित होते.


