
कोपरगाव प्रतिनिधी
सहकार,शिक्षण, कृषी क्षेत्र तसेच समाजकारणात अनमोल योगदान देणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या समाजकार्याची प्रेरणा भावी पिढीला मिळावी. यासाठी ग्रामीण भागाच्या विकासाची जननी असलेल्या पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे यांचा पुतळा उभारला जावा अशी जनसामान्य जनतेची भावना होती. त्या भावनेचा आदर करून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवार (दि.०६) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे यांनी समाजाच्या विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. सर्वसामान्य जनतेप्रती असलेली तळमळ आणि निस्वार्थी समाजसेवा करण्याच्या वृत्तीतून त्यांनी नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात अजोड योगदान दिले आहे. जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पाणी प्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले. जिल्हा परिषदेचे सलग दहा वर्ष अध्यक्ष असतांना त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर विकासाची गंगा पोहोचवली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून भावी पिढीने देखील समाजकारणात येवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला पाहिजे. या उद्देशातून जनसामान्य जनतेची भावना लक्षात घेवून पंचायत समितीच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरणासाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना.जयंतरावजी पाटील, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, गृहमंत्री ना. दिलीपरावजी वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ, जलसंधारण मंत्री ना. शंकररावजी गडाख, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी केले आहे.


