
कोपरगाव प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांची आदर्श विचारसूत्रे समाजमनात रुजवण्याचे महान कार्य कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी आपल्या निखळ दृष्टीतून व शुद्ध जगण्यातून केले. यापाठीमागे होता तो काळे साहेबांचा ध्येयवाद, त्यांच्या या ध्येयवादाला समर्पित होत्या त्या माई. माईंच्या जीवनाचं मूल्य समर्पणात असून त्यांचे व्यक्तिमत्व आधुनिक काळातील स्त्रियांसाठी आदर्श आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज मध्ये कै.सौ.सुशीलाबाई (माई) शंकररावजी काळे यांचे स्मृती-प्रीत्यर्थ आयोजित दोन दिवसीय भव्य आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले की, डोळसपणे सुरु केलेला वक्तृत्व स्पर्धेचा हा उपक्रम गेली २० वर्ष सुरु असून हा सन्मान केवळ माईंचा नाही तर हा एका कर्तबगार स्त्रीत्वाचा, तिच्या उत्कर्षाचा सन्मान आहे. एक कर्तबगार स्त्रीत्व या स्पर्धेच्या निमिताने सन्मानित होत आहे ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष मा. आमदार श्री. आशुतोषदादा काळे हे होते. प्रसिध्द उद्योगपती सुनीलराव दत्तात्रय जगताप, सौ. ललिताताई सबनीस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य. मा. श्री. सुनील गंगुले, मा. श्री. दिलीप दारुणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षीय विचार व्यक्त करताना मा. आमदार श्री. आशुतोषदादा काळे म्हणाले की, माईंच्या स्मृती आजही जागृत असून सुशीलाबाई (माई) यांचा शंकररावजी काळे यांचा जीवन प्रवास सर्व सामान्यांचे आयुष्य समृद्ध करणारा आहे. माईच्या नावाने होत असलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमिताने होणारे वैचारिक मंथन महत्वाचे आहे.
याप्रंगी मा. सुनीलराव दत्तात्रय जगताप यांनीही आपल्या भाषणातून वक्तृत्वातील महत्वपूर्ण दुवे सांगत माईंच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी परीक्षक डॉ. धनंजय भिसे, डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. निवृत्ती मिसाळ, उपप्राचार्य. डॉ. सुभाष रणधीर, डॉ.व्ही.बी.निकम,प्रा. रामभाऊ गमे, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.छाया शिंदे यांनी केले. तर आभार डॉ.सुरेश काळे यांनी मानले.


