
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुका अवर्षणग्रस्त असून कमी पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. तालुक्याच्या जिरायती भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेतून अनुदान घेवून विहीर घेता येत नाही. त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागाच्या गावातील सर्व गावांचे पुर्न: भूजल सर्वेक्षण करावे अशी मागणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांच्याकडे केली होती. त्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून भूजल सर्वेक्षण विभागाने कोपरगाव तालुक्यातील गावांचे पुर्न: भूजल सर्वेक्षण करून तालुक्यातील २१ गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेतून विहीर घेण्यासाठी पात्र ठरविले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील भूभाग पर्जन्यछायेखाली येत असल्यामुळे कोपरगाव तालुक्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा नेहमीच कमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेतून विहीर घेण्यासाठी अनुदान मिळावे यासाठी तालुक्यातील अनेक गावांचे भूजल सर्वेक्षण करून घेतले. त्यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने २१ गावांची निवड केली आहे. यापूर्वी तालुक्यातील ३ गावांची निवड करण्यात आली होती. नवीन २१ गावांची निवड झाल्यामुळे तालुक्यातील एकूण २४ गावातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदी योजनेतून विहिरीसाठी अनुदान घेणे सहज शक्य होणार आहे.निवड झालेल्या २१ गावांसह २४ गावे पुढीलप्रमाणे अंजनापूर, बहादराबाद, बहादरपूर, चांदेकसारे, डाऊच खु., देर्डे चांदव, देर्डे कोऱ्हाळे, धोंडेवाडी, धोत्रे, घारी, जवळके, जेऊर कुंभारी, खोपडी, मढी बु., मढी खु., मनेगाव, पोहेगाव बु., पोहेगाव खु., रांजणगाव देशमुख, शहापूर, सोनेवाडी, सोयेगाव, तळेगाव मळे, वेस या गावांचा समावेश असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.


