
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव शहर आणि विधानसभा मतदार संघातील १ जुलै २०१९ नंतरच्या नविन व विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नावाचा समावेश अन्न सुरक्षा योजनेत करून त्यांना तातडीने शिधा वाटप करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील १ जुलै २०१९ नंतर अनेक नागरिकांनी नविन तसेच विभक्त शिधापत्रिका धारण केल्या आहेत मात्र त्यांना पंतप्रधान मोफत व राज्य शासनाचा शिधा मिळत नसल्याच्या असंख्य शिधापत्रिकाधारकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहे. त्याबाबत तहसिलदार विजय बोरूडे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. सध्या कोरोना महामारीमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी या शिधापत्रिकाधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत तातडींने समावेश करून त्यांना पंतप्रधान व राज्य शासन शिधा लाभ द्यावा. या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविले आहे.





