
कोपरगाव प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून वरूण राजा कोपरगाव तालुक्यात धुवाधार कोसळत असून तालुक्यातील चांदेकसारे जेऊर कुंभारी डाऊच खुर्द या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या पावसात सोनवडी गावातील ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब मोहन जावळे, दिगंबर जावळे, यांच्या सोयाबीनच्या पिकात पाण्याचा अथांग समुद्र दिसत आहे. शेतकऱ्याने अतिशय मेहनतीने पिकांची जोपासना केली पण गेल्या काही दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहेत आता सोयाबीन काढण्यात आली होती पावसामुळे उभ्या असलेल्या सोयाबीनच्या शेंगा फुटू लागल्या
आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकला गेला आहे. तेव्हा सोनेवाडी गावातील आप्पासाहेब जावळे, दिगंबर जावळे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, प्रत्येक गावात पंचनामे करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील हजारो एकर शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले तर काही पाण्यात सडून गेली आहेत. मक्याचेही तेच झाले कणस मोडून जमिनीवर टेकली व पाऊस सुरू झाला. त्या कणसांनाही मोड फुटू लागले असून हाता तोंडाशी आलेले पिक डोळ्या समोर वाया जाताना पाहायची वेळ शेतकऱ्यांवर आली. अजूनही पाऊस उघडत नसून शेतात पाय ठेवता आलेला नाही. शेत व पिक पाण्यात बुडाली असून गुडभर पाय शेतात जातात यामुळे पाणी जिरेपर्यंत त्या पिकात काही राहण्याची तिळमात्र शक्यता राहिलेली नाही. या सोयाबीन व मका पिकांचे शेतकऱ्यांनी विमे उतरविले असून विमा कंपनी व कृषी विभागाने त्याचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


