
कोपरगाव प्रतिनिधी
मनमाड दौड रेल्वेमार्गावर ज्या ज्या ठिकाणी चौक्या आहेत त्या रेल्वे वाहतुक वाढल्याने बंद असतात परिणामी कॉसिंग रस्त्यावरील वाहतुक खोळंबून पडते, ही वाहतुक सुरळीत व्हावी या उददेशाने रेल्वे विभागाने भूयारी मार्ग तयार केले. पण कोपरगांव हददीतील या मार्गात पावसाचे प्रचंड पाणी साठले असुन त्याचा मनस्ताप पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनधारकासह शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे, शेतकरी आदिना होत आहे. हे भूयारी मार्ग म्हणजे डोकेदुखीचे मार्ग बनले आहे. सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांना रेल्वेप्रशासनाने अक्षरक्ष: वा-यावर सोडले आहे.या मार्गावर एकुण १८० रेल्वे चौक्या आहेत. त्यावर एका भूयारी बोगद्यासाठी रेल्वे प्रशासनाने २ कोटी रूपये खर्च केला आहे. भूयारी मार्ग हा बंद रेल्वे चौक्यांना पर्याय होता पण ते ही सपशेल चुकलेले आहे. ज्या ब्रिटीशांनी बांधकाम तंत्रज्ञ प्रगत नसतांनाही मनमाड दौंड रेल्वेमार्ग तयार केला तो स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रनंतरच्या काळातही बंद पडला नाही पण आता संगणक क्षेत्राचा प्रभावी वापर होत आहे, बांधकाम तंत्र प्रगत झाले आहे तेव्हा हे भूयारी बोगदे ज्या अभियंत्यांनी तयार केले त्यांना पावसाच्या पाण्याचा जराही अंदाज येवु नये म्हणजे रेल्वेचा कारभार राम भरोसे म्हणण्यांची पाळी आली आहे. भूयारी बोगदे केल्याने रेल्वे चौक्या प्रवासासाठी बंद केल्या आहेत. पण यात पावसाचे पाणी प्रचंड साठल्याने भूयारी मार्गही बंद आहेत अशा दुहेरी अडचणींत हे प्रवाशी सापडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडे याचे गा-हाणे मांडले तर त्याची सोडवणुक होत नाही. भूयारी मार्गात साठलेले पाणी इंजिनच्या सहाय्याने काढायचे कुणी, पाणी काढले तर ते सोडायचे कुठे, कारण सध्या पाउस ब-या प्रमाणात झाल्याने शेतातही पाणी साठलेले आहे. या भागातील प्रवासी शेतकरी आणि दैनंदिन कामासाठी तालुक्याच्याठिकाणी ये जा करणा-यांना या भूयारीमार्गाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, काहींना आठ ते पंधरा किलोमिटरचा दुरवरचा कोलदांडा पडत आहे, तर आजारी रूग्ण वाचण्याऐवजी यमसदनी जाण्यांची चिन्हे यातुन मोठया प्रमाणांत वाढले आहे.
कोपरगांव चौकी गेट नंबर 69 C चांदर वस्ती जवळील खिर्डी गणेश शिवार गेले 15पंधरा दिवसा पासुन पावसाचे पाणी भरली पाणी उपसा होत नाही 500 लोकाचे रोजचे येणे जाने अवलंबून आहे शेती माल वाहतूक बंद आहे मोटार सायकल रुळावरुन काढावि लागते, दुध उत्पादक शेतकरी वर्गाचे हाल होत आहे, जीवघेणी वाहतूक यमसदनी पाठवेल अशी अवस्था आहे, वेळोवेळी रेल्वेचे स्थानिक प्रशासन दखल घेऊन उपाय योजना करत नाही तेव्हा बाबासाहेब चांदर, संजय चांदर, बाळासाहेब चिंचपुरे,ढगे, आरुण लभडे रवी आढाव साईनाथ रोहम,आशिष महानुर, गंगाराम नेटके, ज्ञानेश्वर चांदर, सार्थक आढाव ,योगेश चांदर, संजय मोडके,जोपर्यंत पाणी उपसा होत नाही तोपर्यंत रेल्वे गेट उघडुन द्यावे अशी मागणी केली आहे.



