
कोपरगाव प्रतिनिधी
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे हे स्मारक अविरतपणे प्रेरणा देणारे असल्यामुळे या पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण व्हावे हि माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. अनेक वेळा त्यासाठी स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह अनेक मंत्र्यांची वेळपण घेतली. तसेच आण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे यांच्याशी पण पुतळ्याचे अनावरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन ठरविले मात्र अनेक कार्यक्रम जाणीवपूर्वक हाणून पाडले. ते कोणी पाडले? कशासाठी पाडले याचे उत्तर आण्णाभाऊ साठे प्रेमी देतीलच पण आज या पुतळ्याचे लोकार्पण झाले याचा विशेष आनंद होत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारा साहित्यरत्न डॉ. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, स्व.कर्मवीर शंकररावजी काळे, स्व. शंकररावजी कोल्हे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले. मंत्री स्व.बाबुराव बारस्कर, केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या पुढाकारातून पुतळा बसविण्यासाठी जागा निश्चित केली. माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या काळात पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. लोकप्रतिनिधी म्हणून स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे या सगळ्यांच्या माध्यमातून स्मारकाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. मात्र काय राजकारण झाले आणि अनेक लोकार्पनाचे होणारे कार्यक्रम हाणून पाडण्यात आले असल्याची खंत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली. तसेच ज्या समाज बांधवांनी डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे लोकार्पण होण्यासाठी संघर्ष, उपोषण, आंदोलन आणि स्मारकासाठी पाठपुरावा केला अशा सगळ्या समाज बांधवांचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले.याप्रसंगी खा.भाऊसाहेब वाकचौरे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे, विधानपरिषद आ. विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


