
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघात गेल्यावर्षी मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे मतदारसंघात जवळपास २४२ सिंचन विहिरी खचल्या आणि बुजल्या आहेत. या विहिरी शासनाच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात याव्या यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासन दरबारी २४२ विहिरींच्या नुकसानीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु यापैकी १३२ प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली असून उर्वरित ११० प्रस्तावांना देखील मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्याकडे केली आहे.
मागील वर्षी मुसळधार पाऊस व पुरामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आणि बुजल्या होत्या. या विहिरींचे अतोनात नुकसान झाल्यामुळे पिकांसाठी सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात पिके करता आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागामार्फत बाधित विहिरींचे प्रत्यक्ष पंचनामे आणि सर्वेक्षण पूर्ण करून घेतले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी २४२ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. यापैकी १३२ प्रस्तावांनाच मंजुरी देण्यात आली. ११० प्रस्ताव विनाकारण नामंजूर करण्यात आल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून महसूल विभागाने स्वतः स्थळपाहणी करून प्रस्ताव तयार केले आहेत. एकाच प्रकारच्या आपत्तीत काही विहिरींचे प्रस्ताव मंजूर करणे आणि काही अमान्य करणे हे योग्य नाही. त्यामुळे कोणताही तांत्रिक पेच निर्माण न करता अमान्य केलेले उर्वरित ११० विहिरींच्या नुकसानग्रस्त प्रस्तावांना देखील प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांच्याकडे केली आहे.


