
कोपरगाव प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे याहीवर्षी गौतम पब्लिक स्कूलमध्ये वारकरी परंपरेचा संस्कारमय वारसा जपत शालेय दिंडी, रिंगण सोहळा आणि हरिनाम गजरातून निर्माण झालेले भक्तीमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणाने, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. धार्मिक परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.रेखा जाधव यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा याविषयी मार्गदर्शन केले. कला-संगीत शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण आणि संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग, भजने व गवळणी सादर करत उपस्थितांना भक्तीमय वातावरणाची अनुभूती दिली.यावेळी प्राचार्य नूर शेख यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे विधिवत पूजन तसेच अश्वपूजन केले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात विद्यार्थ्यांची दिंडी वाजत-गाजत हनुमान ग्राउंडकडे रवाना झाली.
हनुमान ग्राउंडवर पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला. हरिनामाच्या अखंड गजरात विद्यार्थी अक्षरशः देहभान विसरून विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले होते. या भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित पालक, शिक्षक आणि नागरिकांनाही पंढरीच्या वारीचा अनुभव मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता दिंडी व रिंगण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकरावजी काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, इन्स्पेक्टर नारायण बारे, संस्थेचे सर्व सदस्य तसेच पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम उपक्रमाचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिजिकल डायरेक्टर रमेश पठारे तसेच ज्योती शेलार, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, नसीर पठाण, जगदीश गिरी आणि प्रकाश भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी रमेश पठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे नियोजन आणि पालकांचा प्रतिसाद यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.
“शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणे हेच आमचे ध्येय”
आषाढी एकादशी ही श्रद्धा, भक्ती आणि संस्कारांची परंपरा जपणारा पवित्र उत्सव आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि नैतिक मूल्यांचे संस्कार मिळावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी साजरा होणारा आषाढी एकादशीचा दिंडी व रिंगण सोहळा हा धार्मिक श्रद्धा, भारतीय संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा सुंदर संगम असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, सेवाभाव आणि सामूहिकतेची भावना दृढ होते. शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणे हेच आमचे ध्येय असून भविष्यातही असे संस्कारमय उपक्रम सातत्याने राबविण्यास संस्था कटिबद्ध आहे. -सौ.चैतालीताई काळे.


