
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्यासाठी मंजूर केलेले महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ हे राज्याच्या कृषी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय असल्याची भावना मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
आजवर शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांनी खांद्याला खांदा लावून परिश्रम घेतले, मात्र अनेकदा त्यांच्या श्रमांना आणि अधिकारांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. हे विधेयक त्या अन्यायाला उत्तर देणारे असून महिला शेतकऱ्यांच्या सन्मान, अधिकार आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे, असे त्यांनी म्हटले.
स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तसेच राज्य मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. महिला शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांना कायदेशीर संरक्षण, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा हा प्रयत्न निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना सन्मानाने उभे करण्याचे काम या विधेयकातून होणार आहे. महिलांचा सन्मान करणारे हे विधेयक स्वागतार्ह आहे.महिलांना केवळ शेतमजूर नव्हे, तर स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख, अधिकार आणि संधी मिळण्याचा मार्ग या निर्णयामुळे अधिक मजबूत होईल. ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास वाढविणारे आणि शेती अधिक सक्षम करणारे हे विधेयक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
राज्य शासनाने महिला सक्षमीकरणाला केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ठोस धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदन केले. या विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास महिला शेतकऱ्यांचे सामाजिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करत स्नेहलता कोल्हे यांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे नमूद केले.


