
कोपरगाव प्रतिनिधी
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीसाठी कोपरगाव मतदार संघातील काही गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र या नवनगरांसाठी त्या गावातील जमिनी कशा पद्धतीने अधिग्रहीत करण्यात येईल याबाबत सदरच्या अधिसूचनेमध्ये खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण करणेबाबत सरकारने स्पष्ट माहिती जाहीर करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडे केली आहे.
आमदार आशुतोष काळे म्हणाले की, विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीच्या अधिसूचनेत कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे, डाऊच खुर्द, कोकमठाण,जेऊर कुंभारी या गावांचा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत त्या कशा पद्धतीने करण्यात येणार आहेत याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. या जमिनी लँड पुलिंग होणार? की मोबदला देणार? याची स्पष्टता नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकासाला कुठलाही विरोध नाही, विकास झालाच पाहिजे मात्र विकास होत असतांना शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होता कामा नये याची काळजी सरकारने घ्यावी. शेतकऱ्यांमध्ये पसरलेला संभ्रम दूर करून ज्या शेतकऱ्यांच्या संभाव्य जमिनी या प्रस्तावित नवनगरांच्या निर्मितीसाठी अधिग्रहीत केल्या जावू शकतात. त्या कशा पद्धतीने अधिग्रहीत केल्या जाणार आहेत याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सरकारकडे केली आहे.


