
जनतेच्या सुखात समाधान शोधायला शिका
जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात जनता त्यांना डोक्यावर घेते व जे जनतेला गृहीत धरून फक्त खोटा कळवळा दाखवतात त्यांना घरी बसवते. असाच काहीसा प्रकार कोल्हेंच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे वारीचा पूल झाल्यामुळे वारीसह पंचक्रोशीतील नागरीकांचा मागील चाळीस वर्षाचा वनवास संपला आहे. त्याचा आनंद नागरिकांनी पुलाचे काम तडीस नेणाऱ्या आमदार आशुतोष काळेंना डोक्यावर घेवून नाचत व्यक्त केला. याचे दु:ख कोल्हेंना झाले असून वारीचा पूल झाल्यामुळे नागरीक जरी सुखावले असले तरी लाटेवर निवडून गेलेले कोल्हे मात्र दुखावले असल्याची मार्मिक टीका माजी सभापती मधुकर टेके यांनी केली आहे.
मागील चाळीस वर्षापासून रखडलेल्या वारी पुलाचा प्रश्न कोल्हेंना चाळीस वर्ष सत्ता मिळूनही सोडविता आला नाही. तसे पाहिले तर जे आज आपल्यात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. त्यांनी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतांना एकीकडे पाणी प्रश्नाबाबत जनतेपुढे टोकाच्या आंदोलनाची भाषा करायची आणि दुसरीकडे स्वत:च पाणी सोडायचे चाक फिरवायला जायचे हे ज्यांनी अनुभवले आहे पाहिले आहे. हे जुने जाणते शेतकरी आजही त्यांचे अनुभव सांगतात. मात्र जरी कोल्हेंना याचा विसर पडलेला असला तरी त्यांच्या अशा वागण्यामुळे नाईलाजाने ते आज आपल्यात नसतांना त्यांच्याबद्दल बोलावे लागते.
नेहमीच विषयाला वळण देवून विकास कामावरून नागरीकांचे लक्ष कसे विचलित करायचे हे कोल्हेंकडून शिकण्यासारखे आहे. मात्र जनता आता हुशार झाली आहे. सिंचनासाठी अडीच किलोमीटर पर्यंत पाणी देणारे कोण ? आणि सर्वच शेतकऱ्यांना पाणी देणारे कोण हे शेतकरी व जनतेने ओळखले आहे. त्यामुळे कोल्हे कितीही कोल्हे कुई करीत असले तरी त्याचा फरक पडणार नाही. ज्यांनी पाठपुरावा केला, ज्यांनी निधी आणला आणि ज्यांनी काम पूर्ण करून दाखवले त्यांना श्रेय घेण्याचा अधिकार असल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांना तो अधिकार आहेच तो आमदार आशुतोष काळे यांना वारीसह पंचक्रोशीतील नागरीकांनी दिला त्यामुळे कोल्हेंना दिवसा तारे दिसायला लागले आहे. मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्हाला चाळीस वर्षात सोडविता आले नाही हे सत्य स्वीकारा आणि ‘जनतेच्या सुखात समाधान शोधायला शिका’ म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. असा सल्ला माजी सभापती मधुकर टेके यांनी दिला आहे.
चौकट:-पूल नसल्यामुळे नागरीकांना किती अडचणींना सामोरे जावे लागते याची जाणीव असणारा काळे परिवार पुलाचे महत्व जाणून आहे. मात्र नागरीकांना सुविधांपासून वंचित ठेवायचे अशी वृत्ती असणाऱ्या कोल्हेंना ३५ वर्ष सत्ता भोगूनही २००४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्यामुळे धारणगाव-कुंभारी पुलाच्या कामाला कसा विरोध केला.हे धारणगाव-कुंभारी सह पंचक्रोशीतील नागरिक जाणून आहेत याची पुन्हा उजळणी करायला लावू नका.– माजी सभापती मधुकर टेके
– एकोणविसाव्या शतकात तुम्ही जनतेला वेड्यात काढले मात्र आता २० व्या शतकातून २१ व्या शतकाकडे वाटचाल करणारी ही सुज्ञ जनता आहे. म्हणूनच २०१४ ची लाट वगळता तुम्हाला जनतेने कायमचे घरी बसवले आहे. त्यामुळे भाम, भावली, वैतरणा, मुकणे, समन्यायी, पश्चिमेचे पाणी पूर्वेला, निळवंडे या वाक्यावर राजकारण करायचे दिवस आता संपले आहे. जनता सुज्ञ आहे जनतेला वेड्यात काढायचे बंद करा आणि यापुढे आपले सल्लागार तपासून पुढील राजकारण करा.- माजी सभापती मधुकर टेके


