
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने शनिवारी अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका केली. या यशस्वी बचावकार्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, या घटनेनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्याच परिसरात पुन्हा बिबट्याचे ताजे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली असून संपूर्ण परिसरात भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.
शनिवारी शामराव कल्याण वक्ते यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे मोठी बचावमोहीम राबविली होती. तब्बल अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढून जंगलाच्या दिशेने सोडण्यात आले. त्यामुळे बिबट्याचा धोका टळल्याचे वाटत असतानाच रविवारी रात्री उशिरा त्याच परिसरात दोन ठिकाणी बिबट्याचे स्पष्ट ठसे आढळून आले.
ही बाब लक्षात येताच पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड आणि भानुदास वक्ते यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. परिसराची सखोल पाहणी करून ठशांची तपासणी करण्यात आली. पाहणीनंतर आढळलेले ठसे बिबट्याचेच असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. त्यामुळे बिबट्या अद्याप परिसरातच वावरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी पिंजरा उपलब्ध करून दिला. मात्र, विहिरीलगतचा परिसर आणि अवजड पिंजरा योग्य ठिकाणी बसविणे हे मोठे आव्हान होते. उपसरपंच जालिंदर चव्हाण ,भानुदास वक्ते,
उद्योजक संदीप वक्ते, शशिकांत गुरसळ,संतोष जाधव, गणेश पोटे,राणा वक्ते,योगेश जाधव, प्रा. मधुकर वक्ते गणेश पोटे,
यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रम करून पिंजरा योग्य ठिकाणी उभारला. या पिंजऱ्याच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद करण्याचा वनविभागाचा प्रयत्न सुरू आहे.
सलग दोन दिवस बिबट्याशी संबंधित घटना घडल्यामुळे जेऊर कुंभारीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास नागरिक धजावत नाहीत. जनावरे चारण्यासाठी बाहेर नेणे, शेतातील कामे करणे तसेच लहान मुलांना घराबाहेर सोडताना पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांनी शेतात जाताना गटाने जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवावे, आवश्यक त्या ठिकाणी आणखी पिंजरे बसवावेत तसेच नागरिकांना वेळोवेळी सुरक्षिततेच्या सूचना देऊन जनजागृती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त होईपर्यंत भीतीचे हे वातावरण कायम राहणार असल्याने वनविभागाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


