Monday, June 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedरात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण'!!- उपसरपंच जालिंदर चव्हाण

रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण’!!- उपसरपंच जालिंदर चव्हाण

जेऊर कुंभारी वार्ताहर

“जेऊर कुंभारी गावातील रात्रीचे भारनियमन हे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शेतकऱ्यांच्या हिताशी थेट खेळणारे आहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत आहेत. अशा परिस्थितीत रात्री गाव अंधारात ठेवणे हे अत्यंत गंभीर असून महावितरणने तात्काळ भारनियमन रद्द करावे. अन्यथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी दिला.
जेऊर कुंभारी गावातील रात्री सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात सोमवारी ग्रामस्थांनी महावितरणच्या कोपरगाव विभागीय कार्यालयावर घेराव घालत कार्यकारी अभियंता एस. पी. शिंदे यांना सविस्तर निवेदन सादर केले. गावात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जेऊर कुंभारी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून नुकतीच गावाजवळील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे रात्रीच्या अंधारात शेतातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या भारनियमनामुळे ही भीती अधिकच वाढत आहे.
पावसाळ्यामुळे गावात डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाडा व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. जून महिन्यापासून शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
यावेळी बोलताना उपसरपंच जालिंदर चव्हाण म्हणाले, “जेऊर कुंभारीसारख्या शेतीप्रधान गावावर लादण्यात आलेले रात्रीचे भारनियमन हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांची शेतीची कामे, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महावितरणने ग्रामीण भागातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा बेमुदत उपोषणासह तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील.”
यानंतर उपसरपंच जालिंदर चव्हाण, बापुराव काकडे, रघुनाथ वक्ते आणि गणेश वक्ते यांनी कार्यकारी अभियंता एस. पी. शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. यावेळी संतोष धारराव व दिनेश पंढोरे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी नागरिकांची सुरक्षा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन गावातील रात्रीचे भारनियमन तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास व्यापक लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!