
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ रोजी कोपरगाव नगरपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेने केलेली अवाजवी घरपट्टी(मालमत्ता कर) रद्द करण्याचा ठराव मंजूर न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली आहे.कोपरगाव नगरपरिषदेने केलेली अवाजवी घरपट्टी (मालमत्ता कर) वाढ हि अत्यंत चुकीची आणून नागरिकांचे कंबरडे मोडणारी आहे. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असताना देखील कोपरगाव नगरपरिषदे कडून वाढीव करपट्टी लादण्यात येत आहे. वाढीव करामध्ये मालमत्तांचे वर्गीकरण, निर्धारीकरण कसे केले याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आली नाही तरी देखील नागरिकांना वाढीव दराच्या घर पट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांवर थोडी थोडकी नव्हे तर दुप्पट, तिप्पट, चौपट करवाढ लादण्यात आली आहे. यामुळे हि घरपट्टी (मालमत्ता कर) वाढ रद्द करावी आणि ज्या एजन्सीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने करवाढ संदर्भात सर्व्हेक्षण केले आहे ते रद्द करून नव्याने पुन्हा सर्व्हेक्षण करण्यात यावे. हे ठराव सत्ताधाऱ्यांनी मान्य न केल्याने सत्ताधाऱ्यांच्या समाज विरोधी धोरणाच्या आणि हुकूमशाही वृत्तीच्या विरोधात घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
सभा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना गुलाबपुष्प देऊन वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.नगरपरिषदेने लागू केलेली घरपट्टी अत्यंत अवाजवी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसल्याने हजारो नागरिकांनी वाढीव घरपट्टी विरोधात नगरपरिषदेत आणि आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात शेकडो हरकती नोंदविल्या असल्याने या अवाजवी घरपट्टी विरोधात आमदार आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली २२ व २३ जून रोजी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र सर्वसाधारण सभेत कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा झाली नाही. हि अवाजवी घरपट्टी (मालमत्ता कर) अत्यंत चुकीची असल्याचे पुरावे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सादर करून वाढीव घरपट्टी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


