
कोपरगाव प्रतिनिधी
निवडणुकीपुरते राजकारण हवे. निवडणूक झाल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून गावहितासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. गावहिताचा कुठलाही प्रश्न असेल, तर तो सोडविण्यासाठी आमदार या नात्याने पहिले पाऊल आम्ही उचलू, असे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी जाहीरपणे केले.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नव्या व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी प.पू. रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार विवेकभैय्या कोल्हे बोलत होते.सध्या चोहीकडे बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना धामोरी येथे श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्या व्यावसायिक गाळ्यांच्या माध्यमातून ४० उद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून ते उद्योग-व्यवसाय यशस्वीरित्या करू शकतील. श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची स्थापना १९५४ साली झाली असून, आजवर ट्रस्टच्या कामकाजावर कुठलेही शिंतोडे किंवा ताशेरे ओढले गेले नाहीत. ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने विकासकामे करण्यात आली आहेत. आजवर ३१ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, आता नव्याने आणखी १० गाळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक छोटे व्यापारी व उद्योजकांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे धामोरी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत मिळावी, यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार कोल्हे यांनी सांगितले.श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची सुमारे सात एकर जागा शिल्लक असून, या ट्रस्टने तालुक्यातील इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सतर्क राहून शासनाच्या सर्व योजना युवक व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राज्यकर्ते व कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायासाठी विविध योजना उपलब्ध होत असतात. त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.आपला देश कृषिप्रधान असून बाजारपेठाही कृषी अर्थव्यवस्थेवर आधारित आहेत. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी उपबाजार जाहीर करण्यात आला होता. त्यावर काही प्रमाणात राजकारण झाले. मात्र, तांत्रिक अडचणींनंतर तालुक्यातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उपबाजार समितीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे या उपबाजाराचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे.या उपबाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा, तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने मार्केट कमिटीला अधिकृत भरती करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत कोपरगाव येथील उपबाजार सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल, असे ठाम आश्वासन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी शेतकऱ्यांना दिले.यावेळी विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल धामोरी ग्रामस्थांच्या वतीने आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना आमदार कोल्हे यांनी धामोरीसह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या प्रसंगी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव भाकरे, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव शिवाजीराव वाघ, विश्वस्त संपतराव भाकरे, विलासराव जगझाप, राहुल वाणी यांच्यासह प्रवीण जगन्नाथ शिंदे, कैलासराव माळी, अशोकराव भाकरे, बाजीराव मांजरे, विलासराव माळी, ज्ञानदेव मांजरे, नारायणराव मांजरे, मनोज जगझाप, सुनीलराव मांजरे, मनेषराव गाडे, विजयराव जाधव, अण्णा साळुंखे, भाऊसो भाकरे, सोपानराव कासार, विजुभाऊ गाडे, जयराम गडाख, रामराव जगताप, संजय बोडके, राजेंद्र कासार, लव्हाटे सर, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब अहिरे, डॉ. शिंदे, कैलासराव बारे, काकासाहेब वाघ, अविनाश अहिरे, विजयराव साळुंखे, नाजीमभाई शेख, प्रभाकर पारखे, लहू पवार, शंकरराव चव्हाण, श्रीरामराजे भोसले, नारायणराव भाकरे तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


