
कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्यातील मोर्विस येथील उपबाजार समितीत आज शेतक-यांनी चक्क प्रतिकात्मक बाजार भरवीला. सत्ताधारी कोल्हे गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी हा बाजार भरविण्यात आला. येथे शेतमालाचे लिलाव आजवर का सुरू केले नाही असा प्रश्न शेतकरी विचारीत होते. आता आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष घालून येथील बाजार सुरू करावा असे साकडे शेतक-यांनी घातले. हा प्रतिकात्मक बाजार परिसरात चर्चेचा विषय ठरला. मोर्विस बरोबरच सांगवी भुसार, धामोरी, मायगाव देवी, मोर्विस, चास नळी, वडगाव, बक्तरपूर,मंजूर, हंडेवाडी, कारवाडी, वेळापूर आदी गावातील शेतकरी या आगळ्या वेगळ्या आंदोलनात सहभाग घेतला.
शेतक-यांनी या ठिकाणी सत्यनारायण पुजा केली. कांद्याचे लिलाव करून उत्पादकांना प्रतिकात्मक टोकण देखील दिले. सभापती साहेबराव रोहोम व कोल्हे यांचा निषेध केला. उप बाजारासाठी भाडे तत्वावर जागा घेऊन सव्वा वर्षे लोटले. तरीही मोर्विस येथील उपबाजार समितीत सत्ताधारी कोल्हे गटाने अद्यापही शेतमालाचे लिलाव सुरू केले नाहीत. जागेच्या भाड्याचे पैसे वाया गेले. शिवाय या परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यास अडचण निर्माण झाली. त्यांना सध्या विस किलोमिटर अंतरावरील कोपरगाव बाजार समितीत येऊन शेतमाला विकावा लागतो. या उपबाजार समितीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली. वेळेत लिलाव सुरू झाले असते तर परिसरातील गावांना फायदा आणि रोजगार निर्मीती झाली असती. त्यामुळे आजच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतक-यांनी कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम व त्यांना मार्गदर्शन करणा-यांचा निषेध केला.
कोल्हे गटाने नेहमीच कोपरगाव मतदारसंघातील पश्चिम भागावर अन्याय केला. मंजूर बंधारा असो की पश्चिम भागाला जोडणारा धारणगाव-कुंभारी पूल असो त्यांनी कधीही या समस्या सोवडवील्या नाहीत. राज्य मार्ग ७ च्या कामाबाबत देखील असाच अनुभव आहे. सहमतीच्या नावावर बाजार समितीत कोल्हे गटाने सभापती पद मिळवीले. नेहमी प्रमाणे शब्द पाळला नाही. सध्या बाजार समितीत अनाठाई खर्च आणि भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकरी हिताचे निर्णय होत नाहीत. त्यामुळे काळे गटाच्या संचालकांनी यापूर्वीच आपले राजीनामेही दिले. माजी आमदार अशोकराव काळे यांनी पश्चिम भागाला शहराशी जोडणारा धारणगाव-कुंभारी पूल उभारला. आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर बांधाऱ्याचे काम सुरु केले. देर्डे फाटा ते मोर्विस रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरु आहे. त्यामुळे आता आमदार आशुतोष काळे यांनीच वैयक्तिक लक्ष घालून मोर्विस उपबाजार समितीचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे.


