
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कोपरगाव शहरातील नागरीकांना चार दिवसांनी मिळणारे पाणी पाच ते सहा दिवसांनी मिळायला लागले.एकीकडे पाईप लाईनला होणारी गळती तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्या ओव्हफ्लो होवून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे तुम्ही लाखो लिटर पाण्याची नासाडी करायची आणि पाणी फक्त नागरीकांनीच जपून वापरायचे का? असा सवाल कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजेद्र वाकचौरे यांनी कोपरगावकरांच्या वतीने सत्ताधारी गटाला विचारला आहे.जून महिना सुरु होवून जवळपास तीन आठवड्याचा कालावधी होत असून अद्यापही कुठेही पाऊस झालेला नाही त्यामुळे जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही तोपर्यंत शिल्लक पाणी साठा जपून वापरणे हि नागरीकांसह कोपरगाव नगरपरीषदेची देखील जबाबदारी आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीचे कोपरगाव नगरपरीषदेला कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. एका महिन्यात पाचही साठवण तलाव रिकामे करूनही नागरीकांना नियमित पाणी पुरवठा न करू शकणारे सत्ताधारी लक्ष्मीनगर परिसरातील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत असतांना दुर्लक्ष करून नागरिकांच्या हक्काचे लाखो लिटर पाणी वाया घालवत आहे.
एका महिन्यात साठवण तलावांनी तळ गाठल्यामुळे नागरीकांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला सूचना दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना आवर्तन देण्यात आल्यामुळे अडचणी दूर झाल्या असल्या तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा काटकसरीने उपयोग होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होत असतांना त्याकडे होणारे दुर्लक्ष पाहता पाणी फक्त नागरिकांनीच जपून वापरायचे का? असा प्रश्न सर्व सामान्य कोपरगावकरांना पडला आहे. एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरायला सांगायचे आणि दुसरीकडे तुम्ही लाखो लिटर पाण्याची नासाडी करून नागरीकांना पाणी पुरवठा करतांना पाणी पुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ करायची. तुमच्या निष्काळजीपणामुळे संकटकालीन परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे याची जबाबदारी घेवून कोपरगावकरांना पाणी बचतीचे धडे देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या गलथानपणामुळे कोपरगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी असे राजेंद्र वाकचौरे यांनी म्हटलेआहे.


