
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा तळाला गेल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुढील आवर्तन होईपर्यंत तसेच नैसर्गिकरीत्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढेपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. या वस्तुस्थितीला विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असून तो दुर्दैवी असल्याची टीका पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे यांनी केली आहे.पाणीपुरवठ्याबाबत बालिश प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांनी प्रथम आपल्या कारकिर्दीतील कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे. त्यांच्या नेत्यांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आज नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाचे व नियोजनबद्ध पाणी मिळत असल्याचे वास्तव आहे. केवळ राजकीय टीका करण्यापेक्षा वस्तुस्थितीचा अभ्यास करणे विरोधकांसाठी गरजेचे असल्याचे वाजे यांनी म्हटले आहे.
तालुक्याचे हक्काचे पाणी घालविण्याचा इतिहास ज्यांच्या नेतृत्वाशी जोडला गेला, त्यांनी आज पाणीप्रश्नी भाष्य करणे हे आश्चर्यकारक आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागला होता आजही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. दुर्दैवाने आ. आशुतोष काळे यांच्या काळातही दुर्लक्षामुळे तालुक्याच्या पाण्याच्या आरक्षणात घट झाल्याचे प्रकार घडले असून त्याचे परिणाम भविष्यात नागरिकांना भोगावे लागू शकतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.स्वतःच्या चुका आणि अपयश झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याची विरोधकांची पद्धत आता जनतेला चांगलीच समजली आहे. स्वतः पाप करायचे आणि त्याचे खापर इतरांवर फोडायचे, ही नीती आता चालणार नाही. पाणीप्रश्नी जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना नागरिक योग्य वेळी उत्तर देतील, असा परखड टोला पाणीपुरवठा सभापती वैशाली वाजे यांनी लगावला.


