
कोपरगाव प्रतिनिधी
राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा लाभ कोपरगाव शहरातील नागरिकांनाही मिळणे अपेक्षित असताना स्थानिक सदर प्रक्रिया काळात आमदार आशुतोष काळे यांनी याबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने शहरातील हजारो मालमत्ताधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची टीका माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे.
सोनवणे म्हणाले की, कोपरगाव शहरातील सुमारे १८ हजार ६२८ मालमत्ताधारकांवर शास्तीचा अतिरिक्त बोजा पडला असून सामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार व मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. राज्यातील श्रीगोंदा,सिन्नर सासवड, जेजुरी, चाकण, शिरूर, शिरपूर, पाचोरा, गडहिंग्लज अशा अनेक नगरपरिषद क्षेत्रांमध्ये तेथील स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन नागरिकांना शंभर टक्के शास्तीमाफीचा लाभ मिळवून दिला. मात्र कोपरगाव मतदारसंघात अशी कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अथवा निवडणुकीत आपला पराभव झाला या रागापोटी पालिकेवर रोष काढण्यासाठी स्थानिक आमदार काळे यांनी उदासीनता दाखवली.
नगरविकास विभागाने अभय योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याची संधी उपलब्ध करून दिली असताना कोपरगावसाठी त्याचा लाभ मिळविण्यात आमदार म्हणून आशुतोष काळे अपयशी ठरल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला. नागरिकांच्या प्रश्नांबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र ती जबाबदारी पार पाडण्यात झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे त्यांनी नमूद केले.याचबरोबर स्वतःच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी काळे यांनी नगरपरिषदेवर टीका करणे योग्य नसून, उलटा चोर कोतवाल को डांटे अशीच सध्याची परिस्थिती असल्याची टीकाही सोनवणे यांनी केली.


