
कोपरगाव प्रतिनिधी
मागील महिन्यात तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने धामोरी गावासह परिसरात अनेक ठिकाणी विजेचे पोल जमिनीला टेकले आहेत तर अनेक पोल वाकले होते तर अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे वीज वाहिन्या तुटून शेतात पडल्या आहेत तर काही ठिकाणी अजूनही लोंबकळत आहेत ज्या सहजपणे हाताला लागतात.जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी होवूनही महावितरणकडून हे पोल सरळ करण्याचे आणि वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसून सुरु असलेले दुरुस्तीचे काम अतिशय कमी मनुष्यबळात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आल्यामुळे आमदार आशुतोष काळे संतप्त झाले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंत्याला आणि ठेकेदाराला कडक शब्दात चांगलेच सुनावले आहे.आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.१६) रोजी मागील महिन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे विजेचे पोल व वीज वाहिन्यांच्या झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीच्या कामाची नागरीकांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तीन आठवड्याच्या कालावधीत महावितरणकडून दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नसल्याचे व ठिकठिकाणी वाकलेले पोल व जमिनीलगत पडलेल्या वीज वाहिन्या व काही ठिकाणी लोंबकळत असणाऱ्या वीज वाहिन्या ज्या सहजासहजी हाताला लागतील अशा परिस्थितीत दिसून आल्यामुळे आमदार आशुतोष काळे चांगलेच संतापले होते. वाकलेले पोल व लोंबकळत असणाऱ्या वीज वाहिन्या तुम्हाला दिसत नाही का? तुमच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना व वीज ग्राहकांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याची जाणीव आहे का? ऑफिसमध्ये बसून तुम्हाला शेतकऱ्यांच्या अडचणी समजणार नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात जागेवर जावून परिस्थितीची पाहणी करा आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम किती तातडीने पूर्ण झाले पाहिजे याचा गांभीर्याने विचार करा.
दुरुस्तीचे काम किती मोठे आहे त्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून न देता केवळ दोन ते तीनच कामगार दुरुस्तीच्या कामासाठी देता यावरून तुम्हाला वीज ग्राहकांच्या अडचणींशी काहीच देणे घेणे नाही असे दिसते. मात्र यापुढे असा ढिसाळ कारभार मला चालणार नाही. नागरीकांच्या तुमच्या बाबतीत पुन्हा तक्रारी आल्यास त्याचे परीणाम तुम्हाला भोगावेच लागतील अशा कडक शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंत्याला आणि ठेकेदाराची कान उघाडणी केली. तसेच कार्यकारी अभियंत्याला पाहणी दरम्यान भ्रमणध्वनीवरून आवश्यक साहित्य, मनुष्यबळ व यंत्र सामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
येत्या काही दिवसात पावसाला सुरवात होणार असून वाकलेले पोल आणि लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाऊस सुरु होण्यापूर्वी रवंदे, मळेगाव थडी, सांगवी भुसार, मायगाव देवी आणि धामोरी गावातील काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.कामचुकार अधिकाऱ्यांच्या बाबतीत आमदार आशुतोष काळे यांच्या या भूमिकेचे नागरीकांनी स्वागत केले असून नाठाळ अधिकाऱ्यांना यापुढे नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी चालढकल करता येणार नाही.



