
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, चोरी, शेतमाल चोरी तसेच संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी चोरांचा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आढळून आला असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.अलीकडेच कोपरगाव शहरातील संयकमनगर,गावावरेनगर येथील चोरीच्या घटना गंभीर आहेत.काही दिवसांपूर्वी गांधीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच तालुक्यात विविध ठिकाणी शेतमाल चोरी, घरफोडी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.विविध भागात ड्रोन कॅमेरा रात्रीच्या वेळी घरावर घिरट्या घालतात या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी वर्ग यात मोठी दहशत निर्माण झाली आहे अशा गोष्टी सामाजिक सुरक्षेला बाधा निर्माण करण्याचे काम करतात.
या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाणे व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या विशेष मोहीम राबवून अशा विविध गुन्ह्यातील आरोपींना तातडीने जेरबंद करावे, रात्रीची गस्त वाढवावी, संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढवावी तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन चोऱ्यांच्या घटनांचा सखोल तपास करावा, अशी चर्चा वरिष्ठ पोलिस अधिकारी व स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी यांच्याशी आमदार विवेक कोल्हे यांनी केली आहे.
कायद्याचा धाक निर्माण होणे आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे ही पोलिस यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी प्रभावी व तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.कोपरगाव शहर व तालुक्यात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष कृती आराखडा राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले आहे.


