
कोपरगाव प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ऑनलाईन स्वरूपात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.आमदार विवेक कोल्हे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत जनतेच्या दैनंदिन अडचणी आणि मूलभूत प्रश्न अत्यंत ठामपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वीज पुरवठ्यावर बोलताना त्यांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळेस शेतीपंपासाठी पूर्ण दाबाने आणि नियमित वीज मिळावी, तसेच भारनियमन कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच अनेक गावांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठाही सुरळीत होत नसल्याने रात्रीच्या वेळी उन्हाळ्याचे दिवस असल्याने फॅन सारखी घरगुती उपकरणे देखील चालत नाहीत, अनेक घरात लहान मुले, जेष्ठ नागरिक असल्याने या समस्येने नागरिक त्रस्त आहे.
वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, संवत्सर येथील पुलाचे काम सुरू असल्याने नागपूर-मुंबई महामार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक सध्या नगर मनमाड महामार्ग कोपरगाव-पुणतांबा फाटा मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय आधार केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना आधार कार्ड काढणे व दुरुस्तीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांची अधिकच हेळसांड होत असल्याचे त्यांनी सांगत आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी आ. विवेक कोल्हे यांनी केली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हाधिकारी,सर्व लोकप्रतिनिधी,विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


