
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीज वाहिन्यांचे पोल वाकलेले असून वीज वाहिन्या जमिनीच्या दिशेने लोंबकळत आहेत. महावितरणने तातडीने पोल आणि खांब दुरुस्त करून द्यावेत. तसेच मतदारसंघातील वडगाव आणि चासनळी येथील देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी करून मतदार संघातील विविध प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी मांडले. त्यावेळी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.शुक्रवार (दि.१५) रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अनेक गावांमध्ये विजेचे खांब वाकले असून विजेच्या तारा लोंबकळत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीचे फोटो पाठवूनही टोळी उपलब्ध झाल्यावर काम करू अशी वेळकाढू उत्तरे दिली जात आहेत. आता पावसाळा तोंडावर आला असून वादळ-वाऱ्यामुळे हे वाकलेले पोल कोसळून व वीज वाहिन्या तुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे लोंबकळत असलेल्या वीजवाहिन्या वाकलेले पोल तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना महावितरणला द्याव्यात.तसेच सुरेगावच्या महानुभाव पंथीय श्री चक्रधर स्वामी देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आले असल्याचे प्रोसिडिंगमध्ये नोंद आहे परंतु या देवस्थानला निधी देण्यासाठी ‘क’ वर्ग दर्जा नाही असे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही याबाबत जिल्हा नियोजन बैठकीत या विषयाकडे लक्ष वेधले होते. मात्र २०१३ पूर्वीचा हा दर्जा काढून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जर काही देवस्थानांना याच नियमांतर्गत निधी दिला जात असेल तर सुरेगावलाच का डावलले जात आहे असा सवाल आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित करत देवस्थानाला निधी देण्याची आग्रही मागणी केली.
त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडे वडगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान आणि चासनळी येथील श्री रामेश्वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याठिकाणी एकही झाड नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करून निर्वाणीकरण झाले असल्याचा दाखला दिला आहे. तरीही जिल्हा परिषदकडून जिल्हा नियोजनकडे तो प्रस्ताव सादर होत नाही. तो प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात यावा. आरोग्य सुविधांबाबत बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले की मागील बैठकीत मंजूर झालेल्या रुग्णवाहिका अद्याप कोपरगाव तालुक्याला मिळालेल्या नाहीत त्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागासाठी जिल्हा नियोजनमधून निधी दिला आहे. मात्र सुरु असलेले काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात आदी मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या बैठकीत केल्या.यावेळी या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, संबंधित अधिकारी, विविध मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.


