
कोपरगाव प्रतिनिधी
विधानभवनात कालच आमदारकीची शपथ घेतली आणि लगेच पहिला कार्यक्रम म्हणून कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग आला. निश्चितपणे हे मी माझे भाग्य समजतो. चांगल्या कामाची सुरुवात एका धार्मिक कार्यक्रमातून झाली असून सर्व साधुसंतांच्या आशीर्वादाने या नव्या राजकीय जबाबदारीची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील कारवाडी (शहा) येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र व श्री दत्त ध्यान केंद्राच्या वास्तुशांती व लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या निमित्ताने श्री स्वामी समर्थ कथा, अखंड नामजप यज्ञ तसेच श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विवेकभैय्या कोल्हे मनोगत व्यक्त करत होते.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यात्मिक ऊर्जेने अनेकांचे जीवनमान बदलले आहे.अतिशय नवचैतन्य या केंद्राच्या सानिध्यात जाणवते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका आधाराने मोठी मोठी संकटे परततात. संयम ठेवा प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच ही स्वामींची शिकवण अंगिकारून जीवन निश्चितच आदर्श बनवता येते असेही आ.कोल्हे म्हणाले.यावेळी स्वामी सेवेकरी तथा कथाकार संतोष भाऊ जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले.या सोहळ्यास दिंडोरी दरबाराचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, संत जनार्दन स्वामी समाधी स्थान कोपरगाव बेटाचे मठाधिपती परमपूज्य महंत गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज, हरिपाठ आश्रम शिर्डी येथील परमपूज्य महंत महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज, सरस्वती राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथील परमपूज्य महंत श्री राघवेश्वरानंद गिरीजी महाराज,सुदर्शन समूहाचे प्रमुख सुरेश चव्हाणके, माजी मंत्री तथा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे,कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे, कोल्हे कारखाना मा.उपाध्यक्ष अरुणराव येवले व अशोकराव भाकरे, ह.भ.प ज्ञानेश्वर ठाकरे , स्वप्निल भोसले, केदारनाथ तनपुरे, दिलीपराव बनकर, कारवाडी गावच्या महिला सरपंच रुपाली जाधव यांच्यासह परिसरातील स्वामी सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


