Wednesday, April 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedबस प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव आगाराला नवीन बस द्या!!-आमदार आशुतोष काळे

बस प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव आगाराला नवीन बस द्या!!-आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परीणाम बससेवेवर होत असून प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बस प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांची भेट घेवून कोपरगाव बस आगारात कमी असलेल्या बसच्या संख्येमुळे बस प्रवाशांना येणाऱ्या अडचणी त्यांना सांगितल्या व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवीन बस मिळाव्यात अशा आशयाचे निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, शिर्डी-मनमाड-वैजापूर-श्रीरामपूर-संगमनेर- नाशिक या शहरांना जोडणारे कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. याच बरोबर तीर्थक्षेत्र शिर्डी जवळ असल्यामुळे भाविकांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोपरगाव बस स्थानक अत्यंत महत्वाचे आहे. मात्र सध्या कोपरगाव बस आगारात बस संख्या कमी असल्याने प्रवाश्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरोना संकट येण्यापूर्वी म्हणजेच २०१९ पूर्वी कोपरगाव बस आगारात एकूण ९० बसेस कार्यरत होत्या. मात्र सद्य स्थितीत ही संख्या कमी होवून ७२ वर आली आहे. यामध्ये एकूण ८ बस या १३ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तसेच शालेय फेऱ्यांवर होत असल्यामुळे बस सेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
कोपरगाव बस आगाराकडे बस संख्या कमी असल्यामुळे नियोजित फेऱ्या वेळेवर होत नाहीत. अनेक वेळा जुन्या झालेल्या कित्येक बस तांत्रिक बिघाड होवून रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कामानिमित्त, आरोग्य सेवा किंवा इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना वेळेत बस उपलब्ध होत नाही.शालेय विद्यार्थ्यांची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होत असल्यामुळे त्यांना पर्यायी खाजगी साधनांचा वापर करावा लागतो. शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर बस सोडून दुसरी व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो.
बस संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची होणारी ओढाताण व येणाऱ्या अडचणींची दखल घेवून बस प्रवाशांचा व शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव बस आगाराला तातडीने नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली असून या मागणीला परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापूर्वीही नवीन बस मिळाव्यात यासाठी सातत्याने परिवहन खात्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला दहा नवीन बस मिळाल्या आहेत. बस प्रवाशांना येणाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल घेवून पुन्हा नव्याने कोपरगाव बस आगाराला जास्तीत जास्त नवीन बस देणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!