
कोपरगाव प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक शैक्षणिक निर्णयातून गुणवत्ता आणि संधी यांचा संगम घडून आला असून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेच्या सन २०२५-२६ च्या निकालात रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या परीक्षेत तब्बल ४३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, सर्वसामान्य कुटुंबातील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याला सोनेरी पंख बहाल करून उत्तर विभागाने राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करतांना स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ज्याप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या हिताला प्राधान्य देवून निस्वार्थ भावनेतून रयत शिक्षण संस्थेला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले. तोच वसा आणि वारसा पुढे चालवितांना उत्तर विभागाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतांना आमदार आशुतोष काळे यांनी सहा वर्षात उज्वल कामगिरी केली आहे.त्यांनी उत्तर विभागात “गुणवत्ता विकास कार्यक्रम” राबवून शिक्षणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी नियोजनबद्ध उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यामुळे उत्तर विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा ३१७ विद्यार्थी, नाशिक जिल्हा ११८ विद्यार्थी आणि बीड जिल्ह्यातील ०४ विद्यार्थी अशा एकूण ४३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला.
यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे स्वतंत्र गुणवर्ग तयार करून स्पर्धा परीक्षांसाठी अतिरिक्त तासांची व्यवस्था करण्यात आली. विषयानुसार सराव परीक्षा आणि नियमित चाचण्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येवून पालकांशी सातत्यपूर्ण संवाद साधण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे ग्रामीण व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा आत्मविश्वास मिळवून देण्यात उत्तर विभाग यशस्वी झाला आहे. त्यामुळे सक्षम नेतृत्व,योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यशाच्या शिखरावर सहजपणे पोहोचवता येते हे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गेल्या पाच वर्षांत उत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी तब्बल १० कोटी ३५ लाख ८४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली असून त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची वाट अधिक सुलभ होण्यास मदत झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने मिळविलेल्या या यशामागे संस्थेचे पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि पालक यांचे सामूहिक प्रयत्न असले तरी या सर्व घटकांना दिशा देणारे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांची भूमिका अतिशय मोलाची आहे. त्यामुळे यापुढील काळातही यश मिळविण्यात आघाडीवर असलेला उत्तर विभाग आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली अशाच वेगाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार राहील यात शंका नाही.


