
कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारणगाव येथे नुकताच एक अभिनव आणि प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात कोपरगावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध भारूडकार भानुदासजी बैरागी यांची विद्यार्थ्यांनी घेतलेली मुलाखत विशेष आकर्षण ठरली. याच प्रसंगी गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच कविता संतोष चौधरी यांचा शाळेच्या वतीने स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला.
या मुलाखतीमध्ये भानुदासजी बैरागी यांनी आपला थक्क करणारा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोल्हे वस्ती येथे झाले. त्यांनी सांगितले की, आयुष्यात आलेल्या अपयशाने खचून न जाता जिद्द कायम ठेवली पाहिजे. कधीकाळी शेतमजूर म्हणून काम केलेले भानुदासजी आज आपल्या कष्टाच्या जोरावर बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. भारूड कलेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारूड हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती संतांनी आपल्याला दिलेली समाज परिवर्तनाची एक महान लोककला आहे. भारूडातील विनोद हे लोकांचे लक्ष प्रबोधनाकडे वेधण्यासाठी असतात.
ही मुलाखत अधिक रंजक ठरली ती विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे. यामध्ये शुभम विघ्ने, चैताली पाठक, लक्ष्मी जाधव, कार्तिकी थोरात, वैष्णवी रणशूर, सम्यक रणशूर, जयेश कोकाटे, साई कदम, मनस्वी कदम, रितेश थोरात, सत्यम पवार, सृष्टी मोरे, हर्षल विघ्ने, वेदांती रणशूर, सार्थक मोरे आणि स्वरांजली जाधव या विद्यार्थ्यांनी अतिशय धाडसाने आणि उत्सुकतेने प्रश्न विचारले. लहानपणचे खेळ, भारूड शिकण्याची सुरुवात, गुरुजींनी दिलेली शिकवण, भारूडाचा विशिष्ट पोशाख आणि वाद्य यापासून ते आजच्या मोबाईलच्या युगात ही लोककला कशी टिकवावी, इथपर्यंतचे प्रश्न मुलांनी विचारले. या सर्व प्रश्नांना भानुदासजींनी अतिशय सोप्या भाषेत उत्तरे दिली. “मोबाईलच्या जगात वावरताना आपली संस्कृती आणि लोककला विसरू नका,” असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमास संतोष चौधरी, माजी अध्यक्ष बाळू मोरे, सुभाष रणशूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश रणशूर, अंगणवाडी सेविका वनिताताई चौधरी, दिपाली वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि महिला वर्ग उपस्थित होता. शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी आणि शिक्षिका वैशाली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या मुलाखतीमुळे विद्यार्थ्यांना एका यशस्वी व्यक्तिमत्वाचा संघर्ष जवळून अनुभवता आला आणि त्यांच्या मनात लोककलेविषयी नवी ओढ निर्माण झाली.


