Friday, April 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा!!-आ.आशुतोष काळे

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा!!-आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

मंजूर बंधारा तब्बल तीनदा वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी स्व.अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून मोठ्या कष्टाने ४१.५१ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर सात गावातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असून हे शेतकरी मोठ्या आशा आणि अपेक्षेने मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे पाहत आहेत. त्यामुळे जरी नैसर्गिक संकटे आली तरी या संकटांचा सामना करून मजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना दिल्या आहेत.
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवार (दि.०३) रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या समवेत संयुक्तिक बैठक घेतली. या बैठकीत दुरुस्तीच्या कामात येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांनी दुरुस्तीचे काम करण्यात येणाऱ्या अडचणी मांडतांना सांगितले की, मागील वर्षी भर उन्हाळ्यात मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे निसर्गाची साथ मिळाली नाही आणि कामाला ब्रेक लागला. चालू वर्षी देखील पाण्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला अडचणी येत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या निदर्शनास आणून दिले.सदरच्या अडचणी समजून घेवून मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले कि, मंजूर बंधाऱ्यावर मंजूर, चास नळी, हंडेवाडी,धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हा बंधारा तीन वेळा वाहून गेल्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर झाला आहे. त्यामुळे मंजूर बंधाऱ्याची कधी दुरुस्ती होईल याकडे सात गावातील शेतकरी मोठ्या आशा-अपेक्षेने पाहत आहे. मागील वर्षी दुरुस्तीचे काम बहुतांशी प्रमाणात पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. परंतु ऐनवेळी पाऊस झाल्यामुळे हे काम होवू शकले नाही आणि नैसर्गिक संकटापुढे कुणाचे काही चालतही नाही. तरीदेखील आजपासून जोपर्यंत पावसाळा सुरु होत नाही तोपर्यंत मोठा कालावधी मिळणार असून या कालावधीत जास्तीत जास्त काम कसे पूर्ण करता येईल यासाठी सुरु असलेल्या कामाला अधिकची गती द्या. पाणी कमी झाल्यांनतर दुरुस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्चा मालाची जमवाजमव आत्ताच करून ठेवा जेणेकरून काम सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत दिल्या.या बैठकीसाठी नासिक लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हारदे, सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर बत्तीसे, कनिष्ठ अभियंता चेतन शहापूरकर, कंत्राटदार राजेंद्र यादव, निवूत्त अभियंता तात्यासाहेब थोरात आदी उपस्थित होते. मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे
.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!