
कोपरगाव प्रतिनिधी
पश्चिम आशियायी देशात सुरु असलेल्या युद्धाचा ताण संपूर्ण देशातील इंधन वितरण व्यवस्थेवर जाणवत असून कोपरगाव तालुक्यामध्ये देखील व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर आणि छोट्यामोठया व्यावसायिकांवर पडत आहे. हि तात्पुरती टंचाई असून इतर देशांच्या तुलनेत केंद्र व राज्य सरकारच्या योग्य निर्णय व घेतलेल्या धोरणांमुळे देशात व राज्यात परिस्थिती अतिशय चांगली आहे. तरीदेखील सर्वसामान्य नागरिकांना व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि गॅस एजन्सी व वितरीकांनी समन्वय ठेवून गॅस वितरणाचे योग्य नियोजन करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाई व कोपरगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याची झळ थेट सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये गॅस मिळेल की, नाही? या भीतीपोटी वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गॅसचे बुकिंग करण्यासाठी एजन्सीला संपर्क करतात. त्यावेळी एजन्सी चालकांनी आपल्या अडचणींचा राग गॅस ग्राहकांवर न काढता ग्राहकांना व्यवस्थित समजून सांगा. ही परिस्थिती हाताळण्यासाठी गॅस एजन्सींनी अत्यंत संयमाने आणि पारदर्शकपणे काम करणे गरजेचे असून प्रत्येक एजन्सीने आपल्या कार्यालयात एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी. जेणेकरून ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नाला योग्य प्रतिसाद देऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. तसेच डिलिव्हरी बॉईजनी देखील आपले मोबाईल फोन चालू ठेवून ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधावा. गॅस वितरण व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा काळाबाजार, वशिलेबाजी आणि गॅस वितरणाचा गोंधळ सहन केला जाणार नाही. नागरिकांना वेळेवर गॅस पुरवठा झाला पाहिजे काही अडचणी आल्या तर थेट माझ्याशी संपर्क साधा मात्र नागरीकांना अडचणी येता कामा नये अशा स्पष्ट सूचना आ.आशुतोष काळे यांनी गॅस एजन्सीच्या प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहे.यावेळी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पुरवठा अधिकारी देविदास फोपसे, श्रीमती आदिती भालेराव, नितीन चौधरी, दिपक गरुड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक शैलेश साबळे, जनार्दन कदम, राहुल शिरसाठ, संदिप कपिले, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब रुईकर, सोमनाथ आढाव, विजय त्रिभुवन, माजी नगरसेवक फकिर कुरेशी, रमेश गवळी, कोकमठाणचे उपसरपंच दिपक रोहोम, सचिन गवारे, जुनेद शेख, अमित आगलावे, अर्जुन मरसाळे, मयुर शिंदे, अमजद शेख, मधुकर रोहोम, लक्ष्मण सताळे, योगेश कानडे, आण्णा जाधव, गॅस एजन्सीचे संचालक विसपुते, विशाल जगताप, बाबासाहेब परजणे, रविंद्र वाघमारे, शिवाजी अडसुरे आदींसह मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. कोपरगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे, फळबागांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि झालेल्या नुकसानीचा अचूक अहवाल शासनाकडे सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहील. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवून प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने झालेल्या नुकसानीचे वेळेत पंचनामे पूर्ण करावे.-आमदार आशुतोष काळे.
पुरवठा विभाग व रेशन दुकानदारांना अल्टीमेटम शासनाकडून रेशनकार्ड धारकांना होत असलेल्या मोफत धान्य पुरवठ्यापासून रेशन दुकानदारांनी एकाही रेशनकार्ड धारकाला वंचित ठेवू नये. ज्या रेशनकार्ड धारकांची रेशन दुकानदारांकडून अडवणूक केली जात असेल अशा नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा. रेशनकार्ड धारकांची अडवणूक करणाऱ्या रेशन दुकानदारांची किंवा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा ईशारा आ. आशुतोष काळे यांनी यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी व रेशन दुकानदारांना दिला.गॅस टंचाई तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व गॅस एजन्सी संचालकांना मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे.


