
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना नाशिक पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी व दंडनीय व्याज भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहे. आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पाणीपट्टी नोटिसांमुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटात सापडला असल्याने आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन थकीत पाणीपट्टी व दंड माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पुढे म्हणले कि, नाशिक पाटबंधारे विभागाने सिंचन कायदा १९७६ अन्वये थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली असून वसुली करताना वस्तुस्थितीचा विचार करण्यात आलेला नसल्याचे आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात सिंचनासाठी पाण्याचा वापर केलेला नाही. तरीही त्यांच्या नावावर पाणीपट्टीची आकारणी करण्यात आली आहे. अशा प्रकारची ही पोकळ आकारणी असल्यामुळे थकबाकीचा आकडा फुगलेला असून त्यावरील दंडाची रक्कम वाढलेली दिसत आहे.आजचा शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. दुष्काळ, अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यातच उत्पादित शेतमालाला बाजारात मिळणारा भाव योग्य नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीत मुळातच फुगवून आलेली पाणीपट्टी आणि त्यावरील दंडनीय व्याज भरणे सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे नाशिक विभागाच्या या नोटिशीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि प्रत्यक्षात पाण्याचा न झालेला वापर या बाबी गांभीर्याने विचारात घेऊन जलसंपदा विभागांतर्गत असलेली ही थकीत पाणीपट्टी आणि त्यावर आकारण्यात आलेले दंडनीय व्याज तातडीने माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे केली आहे.


