
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करत ‘कालांश राजगिरा लाडू उद्योगा’ला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उद्योगाची प्रत्यक्ष माहिती घेत राजगिरा लाडूचा आनंदही लुटला. शिक्षकांनी उद्योगाची कार्यपद्धती समजावून सांगत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजवण्याचा प्रयत्न केला.
लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित व्हावी, तसेच शालेय शिक्षणाबरोबर उद्योग क्षेत्राची ओळख व्हावी या उद्देशाने अशा सहलींचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले. खडकी येथील कोपरगाव शाखेची ही शाळा शंभर वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखली जाते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगाचे प्रवर्तक रोहित काळे व विनय काळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी रेणुका काळे, उमेश मोरे, ललित केदारी, मोहित कापसे तसेच धारणगाव येथील मिथुन रणशूर, राहुल रणशूर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कालांश महिला बचत गटाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाचे महत्त्व तसेच पौष्टिक आहाराचेही मार्गदर्शन केले. बदलत्या खानपानाच्या सवयींमध्ये योग्य आहाराचे महत्त्व स्पष्ट करत राजगिरा लाडूचे पौष्टिक मूल्य समजावण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने उद्योगाची माहिती घेतली तसेच राजगिरा लाडूचा आस्वाद घेतला. या प्रसंगी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण न देता उद्योग क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळणे आणि क्षेत्रभेटींचा अनुभव मिळणे आजच्या पिढीसाठी आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


