Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedयशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम!!- ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम!!- ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग

कोपरगाव प्रतिनिधी

शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल, ये-जा विभागाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आगामी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा व निरोप समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग होते. कार्यक्रमाची सुरुवात आत्मरूपाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक ये-जा विभागाचे प्राचार्य नितीन सोनवणे यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय दुशिंग म्हणाले की, सध्याच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हेच यशाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन व आत्मविश्वासाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवावे. दहावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाची परीक्षा असून या टप्प्यावर घेतलेले निर्णय भविष्यातील करिअर ठरवतात, असे त्यांनी सांगितले. पालक, शिक्षक व शाळा प्रशासनाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, पुनरावृत्ती व सरावावर भर द्यावा. अपयशाची भीती न बाळगता जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी आत्मा मालिक इंग्लिश मिडियमचे प्राचार्य माणिक जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ गुण मिळवणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट नसून सुसंस्कार, शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
तसेच आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल, ये-जा विभागाचे प्राचार्य नितीन सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आई-वडील व गुरुजन यांचा कधीही विसर पडू देऊ नका. त्यांनी दिलेले संस्कार आपल्या कृतीतून जपा. तसेच आरोग्याची काळजी घेऊन तणावमुक्त वातावरणात अभ्यास करा, असे आवाहन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववी अ व ब च्या विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून स्वराली बारसे, श्रेया जावळे, साईनाथ कामटे, अपूर्वा देसाई, सृष्टी जपे, साई शिवाणी, तेजेस्वनी वक्ते यांनी शाळेविषयी कृतज्ञताभाव व्यक्त केला.
या सर्व दहाविच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब,सर्व ट्रस्ट मंडळ,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक सर यांनी पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक बि एन जावळे सर यांनी मानले. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय दुशिंग, प्राचार्य माणिक जाधव, प्राचार्य नितीन सोनवणे, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या मिनाक्षी काकडे, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!