
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील दिगंबर कोंडाजी वक्ते यांनी एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केलेली होती. त्यात ११ केव्हीए क्षमतेच्या वीजेची तार तुटून अचानकपणे स्पार्क होऊन गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अर्धा एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याची सर्व भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जेऊर कुंभारी शिवारात गट नं ५६/४ मध्ये दिगंबर वक्ते यांचे एक एकर उसाचे क्षेत्र असून त्यात २६५ जातीच्या उसाची लागवड करण्यात आली होती. तो परिपक्व होऊन चालू गळीतास नोव्हेंबर अखेर तोड येणार होती, परंतु गुरूवारी दुपारी दोन वाजता, वीज वाहिन्या अचानकपणे तुटून उसावर पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. आगीचे स्वरूप रौद्र होते. त्यात अर्धा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.
याबाबत दिगंबर वक्ते,नितीन वक्ते, शिवाजी वक्ते, सुनिल वक्ते, आदिनाथ वक्ते, दिपक वक्ते, साहेबराव वक्ते, ऋषी चव्हाण, योगेश चव्हाण यांनी पेटलेला उस विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. महावितरणने पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दिगंबर वक्ते यांनी केली आहे.


