
जेऊर कुंभारी वार्ताहर
“स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक अडथळे, अपयश आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्यात खचून न जाता, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर नक्कीच यश मिळवता येते,” असे प्रतिपादन साई आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय केशवराव होन यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील साई आधार प्रतिष्ठानतर्फे नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या रिंकू गोविंदराव जावळे हिचा सत्कार करण्यात आला. रिंकू हिने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या परीक्षेत महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक, तसेच संपूर्ण राज्यातून तेरावा क्रमांक मिळवत नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी यशस्वीपणे निवड मिळवली.
तिच्या या यशाबद्दल साई आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय होन, उपाध्यक्ष वैभव पवार, सचिव प्रवीण औताडे, खजिनदार संचित काळे, सदस्य भाऊसाहेब औताडे व ज्ञानेश्वर औताडे यांनी पुष्पगुच्छ देऊन रिंकूचा सत्कार केला.
यावेळी बोलताना विजय होन म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हे जीवन बदलण्याचे साधन ठरू शकते. रिंकूने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत यश मिळवले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कर्मवीर शंकरराव काळे विद्यालयात झाले. दहावीत प्रथम क्रमांक मिळवून पुढील शिक्षण कोपरगावच्या एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये घेतले. तिने संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमबीए फायनान्स व सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्येही तीने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या कठोर परिश्रमांमुळेच आज तिला हे मोठे यश मिळाले.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोविंदराव जावळे यांनी केले.
रिंकू जावळे हिच्या यशामुळे ग्रामीण मुलींसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. तिच्या यशाचे संपूर्ण गावाला आणि प्रतिष्ठानला अभिमान वाटत आहे.


