

जेऊर कुंभारी प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरमेवस्ती ( जेऊर कुंभारी ) येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘बालांकुर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी मारुती मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या विजेत्या प्रसिद्ध गायिका कु. गौरी पगारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता पाचवीच्या कु. शुभांगी गायकवाड, कु. त्रिशा मोहन आणि कु. श्रावणी चव्हाण या विद्यार्थिनींनी केले.
कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रास्ताविक उपाध्यापक व ‘बालांकुर’चे संपादक सुदाम साळुंके यांनी केले. त्यांनी शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. As a Teacher या उपक्रमांची दखल खुद्द शिक्षण विभागाने घेतली आहे. जि. प. अहिल्यानगरच्या ‘मिशन आरंभ’ उपक्रमांतर्गत चौथीपासून नवोदय, शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, ऑनलाईन व जादा तासिका, सराव परीक्षा, विविध गुणदर्शन आणि विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा उल्लेख केला. बालांकुर पुस्तक निर्मितीसाठी गटशिक्षणाधिकारी मा. श्रीमती शबाना शेख आणि गटविकास अधिकारी मा. श्री. संदीप दळवी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
विश्वस्त, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी भूषविले.
शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल आणि ‘बालांकुर’ पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यानंतर प्रकाशन कार्यक्रम, प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध गायिका कु. गौरी अलका पगारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मुलांनी मुलांसाठी तयार केलेल्या पहिल्या ‘बालांकुर’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. टाळ्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘बालांकुर’ पुस्तक व शाळेचे स्मृतिचिन्ह देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. शिक्षकांच्या डोळ्यातही समाधानाची चमक होती. आपले कार्य फळाला आले, हे पाहून हा कार्यक्रम केवळ एक दिवसाचा नव्हता, तर तो एक परिवर्तनाचा आरंभ होता. शिक्षण, संस्कार आणि संस्कृती यांचा संगम होता आणि तो घडविला गिरमेवस्तीच्या प्रेरणादायी शिक्षकांनी, पालकांनी आणि लहानग्या ‘बालांकुर’ प्रतिभांनी !
मा. शबाना शेख (गटशिक्षणाधिकारी, पं.स. कोपरगाव) यांनी ऑनलाईन माध्यमातून आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मुलांनी मुलांसाठी ‘बालांकुर’सारखे पुस्तक तयार करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या कु. गौरी अलका पगारे (झी मराठी लिटल चॅम्पस विजेत्या) यांनी आपल्या मधुर वाणीने आणि ‘मित्र वनव्यातला गारव्यासारखा’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमात रंगत भरली. त्यांनी मुलांना शुभेच्छा देताना सांगितले की, मोठे होण्यासाठी केवळ पैशाची गरज नसते, तर जिद्द, मेहनत आणि चिकाटीची आवश्यकता असते. त्यांनी मुलांशी व पालकांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विश्वस्त जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब अध्यक्षीय भाषणात गिरमेवस्ती शाळेच्या शैक्षणिक दर्जाचे आणि विविध उपक्रमांचे कौतुक केले. मुलांनी मुलांसाठी पहिले ‘बालांकुर’ पुस्तक तयार करण्याचा विक्रम गिरमेवस्ती शाळेने केला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यासाठी सुदाम साळुंके सरांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. पुस्तकातील गोष्टी बोधपर असून त्यातील प्रतिज्ञा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यायोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मा. शिवाजीराव वक्ते (माजी सभापती) यांनी गिरमेवस्ती शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळेतील उपक्रमांचे कौतुक करताना शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीची विशेष प्रशंसा केली.
श्री.भीमराज वक्ते (दि न्यू इंडिया इन्शुरन्स) यांनी गिरमेवस्ती शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि सांगितले की, इतर शाळांनी या शाळेचा आदर्श घ्यावा. इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण अधिक दर्जेदार असते, हे गिरमेवस्ती शाळेने दाखवून दिले आहे. शाळेतील तिन्ही शिक्षकांनी आजपर्यंत अनेक नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सुवर्णा चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, त्यांनी स्वतःच्या मुलीला इंग्रजी माध्यम सोडून गिरमेवस्तीच्या मराठी शाळेत प्रवेश दिला. या निर्णयामागे साळुंके सरांनी घेतलेली मेहनत, अभ्यासपुस्तके तयार करून दिलेली मदत, व ‘As a Teacher’ नावीन्यपूर्ण उपक्रमांचा परिणाम होता. त्यांनी नमूद केले की त्यांच्या मुलीसह इतर सर्व मुलांचे मोठे शैक्षणिक परिवर्तन घडून आले आहे. संचालक बाळासाहेब वक्ते
केंद्र प्रमुख, चांदेकसारे रावसाहेब लांडे ग्रामविकास अधिकारी
संजय दुशिंग,संजय दहिफळे विषय तज्ञ पं.स.कोपरगाव, ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्य ,मिथून चव्हाण- साई धाम शिर्डी, पाटीलबा शहाजी वक्ते व ग्रामस्थ, पालक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शाळेतील उपक्रम, शिक्षकांचे समर्पण आणि विद्यार्थ्यांचे यश याचे कौतुक केले.
या प्रसंगी इयत्ता पाचवीच्या कु. शुभांगी गायकवाड, कु. त्रिशा मोहन आणि कु. श्रावणी चव्हाण, साई वक्ते व सहजानंद वक्ते या विद्यार्थ्यांनी प्रभावी आत्मविश्वासपूर्वक मनोगत व्यक्त केले.
शिक्षक मनोगत व्यक्त करताना अनुज ढुमणे सर यांनी शाळेतील सर्व उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केले होते. निमंत्रण, सजावट, पाहुण्यांचे स्वागत, अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी खूप चोखपणे पार पाडल्या. हा कार्यक्रम म्हणजे शिक्षणाचा उत्सव होता. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव, शिक्षकांच्या प्रयत्नांची दखल, पालकांचा सहभाग आणि संपूर्ण ग्रामसमुदायाचा सहभाग या घटकांनी हा कार्यक्रम यशस्वी ठरविला. गिरमेवस्ती शाळेने हा ‘बालांकुर’ उपक्रम राबवून ग्रामीण भागातील शाळाही दर्जेदार शिक्षणाची केंद्रे होऊ शकतात हे सिद्ध केले. हा उपक्रम इतर शाळांसाठी आदर्श ठरणार आहे, यात शंका नाही. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर जीवनकौशल्ये, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, आत्मविश्वास आदी अंगी बाणवतात. ‘बालांकुर’ हे पुस्तक म्हणजे त्या सर्व गुणांचे मूर्त स्वरूप आहे.
मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका जोशी यांनी सर्व उपस्थितांचे, मान्यवरांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे आभार मानले.



