
जेऊर कुंभारी वार्ताहर
शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी येथे स्व. अण्णांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी, अण्णांचे जिवश्य कंठश्य मित्र व संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलाल शेठ अग्रवाल, सचिव मा. संजयजी नागरे सर, कार्यकारी संचालक व प्राचार्य मा. आकाशजी नागरे सर, उपप्राचार्य श्री निलेश औताडे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री रवींद्र साबळे सर, समन्वयक दिपक वक्ते, स्मिता देशमुख, मोनाली सुराळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम, मान्यवरांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर, कलाशिक्षक दत्ता डोखे यांनी प्रास्ताविक सादर करताना अण्णांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. जी एम पगारे यांनी अण्णांच्या शैक्षणिक चळवळीची दैदिप्यमान कारकीर्द विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवतांना सांगितले की, अण्णा हाडाचे लेखक आणि वाचक होते. विविध क्षेत्रातील त्यांचा गाढा व्यासंग होता. जुनी आकरावी शिक्षण झालेल्या अण्णांचं इंग्रजी भाषेवर अफाट प्रभुत्व होते.कोणत्याही विषयावरची त्यांची भाषणे म्हणजे वक्तृत्व कलेचा अजोड नमुना होता. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ भक्कमपणे रोवून त्यांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. म्हणूनच, आजही या शैक्षणिक क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हणून अण्णांचं नाव आदराने घेतले जाते.
उप प्राचार्य निलेश औताडे सर यांनी अण्णांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, काही व्यक्ती अशा असतात ज्या इतरांचं भलं व्हावं यासाठी आयुष्यभर झटतात. त्यांची दूरदृष्टी आजही समाजाला अत्यंत भरीव असं योगदान देते. स्व. लहानुभाऊ नागरे अण्णा अशाच थोर व्यक्तींपैकी एक होते. कोपरगाव तालुक्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लावलेल्या शिक्षणाचा ज्ञानदीप आजही तेवत आहे.
ग्रामीण भागात समाज परिवर्तनाची गंगा न्यायची असेल तर त्यासाठी शिक्षणासारखा दुसरा गुरु नाही. हे सुमारे तीस वर्षांपूर्वी जाणणारा आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारा एक अवलिया म्हणून शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा यांच्याकडे पाहिलं जातं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूर्वी गंगवाल व कु.हंसजा झिंजाड या सातवीच्या विद्यार्थिनींनी केले तर आभार सारंग पटेल सर यांनी व्यक्त केले.



