Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ सोहळ्यास रेकॉर्डब्रेक गर्दी!!

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ सोहळ्यास रेकॉर्डब्रेक गर्दी!!

कोपरगाव प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने शिवजयंतीनिमित्त युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या टीव्ही स्टार सुप्रसिद्ध युवा शाहीर रामानंद उगले यांच्या ‘शाहिरी शिवदर्शन’ व लोकगीतांच्या कार्यक्रमास कोपरगावकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर पहिल्यांदाच मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्री झालेल्या या कार्यक्रमात युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात वीररसाने ओतप्रोत भरलेल्या पोवाड्यासह विविध लोकगीतांचे दमदार सादरीकरण करून उपस्थित हजारो शिवप्रेमींची मने जिंकली. कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील अशा या भव्य दिव्य व दिमाखदार सोहळ्यास श्रोत्यांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती.
कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवाभावी सहकारी संस्थेच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, संजीवनी उद्योग समुहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे, रेणुकाताई कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या अविस्मरणीय सोहळ्यात युवा शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून शाहिरी व पोवाड्याच्या माध्यमातून युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांची शौर्यगाथा मांडून उपस्थित हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले. उगले यांच्या भारदस्त आवाजातील अंगावर शहारे आणणारे स्फूर्तिदायक पोवाडे ऐकताना नागरिक अक्षरश: भारावून गेले होते. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर शिव जन्मोत्सव साजरा झाला. शाहीर रामानंद उगले यांनी ‘करतो वंदना गौरीनंदना’ या गीतानंतर शिवजन्माचा पोवाडा सादर केला. त्यांनी सादर केलेल्या दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघिण, जगदंबा मातेचा गोंधळ, प्रतापगडचा रणसंग्राम, नवरा माझ्या मुठीत, डोहाळे माझ्या हक्काचे, अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, गाडी घुंगराची आली आदी गीतांना रसिकांची भरभरून दाद मिळाली. माधवी उगले यांनी आपल्या दमदार आवाजात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व शिवछत्रपतींच्या कार्याची थोरवी गायली. उत्तरोतर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वातावरण शिवमय झाले होते. शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, युगपुरुष, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श नीतिवंत राजे, समतेचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी शासनकर्ते होते. त्यांनी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. महिलांचा आदर, सन्मान केला. त्यांचे शौर्य, पराक्रम, त्याग, समर्पण, धाडसी कार्यशैली, दूरदृष्टी, व्यवस्थापन, सुशासन, अथक संघर्ष, अविचल जिद्द हे केवळ मराठी माणसांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्फूर्तीचा अखंड झरा आहे. त्यांची धोरणात्मक कौशल्ये व आदर्श शासन व्यवस्था आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. केवळ एक दिवस शिवजयंती साजरी न करता छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन त्यांचे गुण व विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याची आज खरी गरज आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने आज हा सुंदर कार्यक्रम घेऊन शिवप्रेमी नागरिकांना शिवजयंतीची अविस्मरणीय भेट दिली असल्याचे सांगून त्यांनी विवेकभैय्या कोल्हे व सर्व युवा सेवकांचे अभिनंदन केले.
विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानने गेल्या नऊ वर्षांत सामाजिक, युवा सशक्तीकरण, कृषी, आरोग्य, पर्यावरण या पाच उद्दिष्टानुसार केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडून जनतेच्या सेवेसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. युवा शाहीर रामानंद उगले, अप्पासाहेब उगले, सुनील उगले, माधवी उगले, आरती गवारे, कल्याण उगले, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश उगले, दत्ता गवारे, विशाल उगले, सागर उदावंत, स्वप्निल घाटोळे, शुभम सावंत व सहकारी कलाकारांचा सत्कार स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवाभावी सहकारी संस्थेने अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त घेतलेल्या ‘घर ते रांगोळी’ स्पर्धेतील विजेत्या सरिताताई लाहोटी, स्वराताई तोरपिसे, तेजस्विनी कुंधारे, गौरी दिवटे, निर्मलाताई आढाव, गौरीताई थोट, प्रमिलाताई साळुंके, स्नेहलताताई ठोंबरे, प्रभाताई तापसे, प्रियंका मुंडलिक, डॉ. ज्योतीताई जगदाळे, समृद्धीताई कदम, अश्विनीताई गायकवाड, अनुष्का पंडोरे, मयुरीताई डागा, स्मृतीताई डागा आदींना स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पैठणी, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रामदास गायकवाड तर प्रास्ताविक सिद्धार्थ साठे यांनी केले.
स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे, रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे यांनी कसलाही बडेजावपणा न करता पूर्ण वेळ श्रोत्यांमध्ये बसून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. युवा शाहीर रामानंद उगले यांनी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करून ‘विवेकभैय्या हाय दमदार, कधी कुणाला नाही भिणार, घेऊन विचार शिवबाचा, कितीक येतील-जातील राहील आवाज वाघाचा’ हे गीत सादर केले. या गाण्यावर विवेकभैय्या कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत शानदार नृत्य केले. यावेळी विवेकभैय्यांची जबरदस्त क्रेझ दिसून आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!