
सर्वच प्रस्थापित नेते सत्तेत असून उपयोग तरी काय ?
आकाश नागरे यांचा लोकप्रतिनिधींना सवाल
कोपरगाव प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी पेरलेली संपूर्ण पिके, सोयाबीन, कापुस व इतर कडधान्यासह फळबागांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असल्याचे चित्र डोळ्यासमोर असताना देखील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी तातडीने पाणी द्या अशी मागणी केलेली असताना पाणी मिळाले नाही. सिंचनासाठी नाही पिण्यासाठी पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असुन कोपरगावच्या गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यास सत्तेची कायमच ढोलकी वाजवत फिरणारे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह कोपरगांवचे आजी माजी लोकप्रतिनिधींना अपयश आले असुन या लोकप्रतिनिधींचा सत्तेत राहून सर्व सामन्यांना उपयोग तरी काय असा खरमरीत सवाल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी उपस्थित केला आहे.
गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी सिंचनासाठी पाणी मिळेल या हेतूने कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी ७ नंबर फॉर्म भरलेले असताना पाणी अद्यापही मिळाले नाही. पाणीच देणार नव्हते तर शेतकऱ्यांना फॉर्म का भरायला लावले? पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगताय की ७ नंबर फॉर्म भरुन देखील फक्त ५०% क्षत्राला पाणी मिळण्याची शक्यता आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी कशा पद्धतीने मिळेल हे प्रयत्न करणे गरजेचे असताना देखील पाटबंधारे विभागाने पाण्यासाठी कुठलेही नियोजन केले नसुन ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची खरीफ पिके वाया गेली. त्यात विहिरींनी देखील तळगाठल्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या १००% क्षेत्राला पाटाचे पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही.
शेतकऱ्यांबाबत लोकप्रतिनिधींना कळवळा असता तर शासनदरबारी पाठपुरावा करुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळवून दिले असते परंतु तसे न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आजी माजी लोकप्रतिनिधी श्रेय वादाच्या लढाईत व्यस्त झाले. राज्यातील सत्तेत काम करणारे पालकमंत्रीसह कोपरगावचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी नुकत्याच कोपरगांव दौऱ्यात मराठा आरक्षणासाठी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनवरणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी भेट देवून उपोषण सोडवलं परंतु या शेतकरी प्रधान समाजातील एकाही लोकप्रतिनिधींना आश्रु अनावर झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ नसुन न्याय देता आले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
तालुक्यातील सर्व माजी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सदस्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुग गिळून बसले असून यांना फक्त निवडणुकांच्या तोंडावर मतांसाठी शेतकरी व सर्व सामान्य माणूस आठवतो. तालुक्यातील सर्वच राजकीय नेते, पदाधिकारी, सहकारी संस्थांचे संचालक मागील अनेक दशकांपासून कोपरगांव शहर व तालुक्यातील मुलभूत समस्या सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी राजकिय संन्यास घ्यावा आणि तालुक्यात सर्वच स्तरावर नवीन नेतृत्वाला संधी द्यावी. अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा देखील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला आहे.


