
कोपरगाव प्रतिनिधी
आत्मा मालिक करिअर अकॅडमीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत यावर्षी वेगवेगळ्या पदांवर निवड झालेल्या १३ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आत्मा मालिक करिअर अकॅडमी सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस माजी आयुक्त हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, के.जे.एस महाविद्यालयाचे विश्वस्त संदीप रोहमारे, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे माजी पोलीस निरीक्षक बारावकर, संत श्री प्रेमानंद महाराज, के.जे.एस महाविद्यालयातील भुगोल विभाग प्रमुख डॉ. वासुदेव साळुंखे, संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी व्हाईस चेरमन बाळासाहेब वक्ते हे उपस्थित होते.
आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे मुख्याधिकारी विवेक भाऊसाहेब चौधरी, पोलीस उपनिरीक्षक हृषीकेश दत्तात्रय नरोडे, दीप्ती भाऊसाहेब घारे, हिमांशू देविदास नागरे, कनिष्ठ अभियंता तेजस बापूसाहेब मते, मंत्रालय लिपिक स्वप्नील काशीराम देवरे व नितीन तुळशीराम पिरनाईक, मुंबई पोलीस सारिका सचिन जगताप व मयुरी बबन सोनवणे, किरण अप्पासाहेब बरबडे, चेतन संजय सोनवणे, सचिन राजेश घुगे, वार्ड सहाय्यिका नर्सिंग, रक्षा मंत्रालय अंतर्गत, मिलिटरी हॉस्पिटल सुश्मिता विलास सोनवणे हे १३ विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या पदांवर निवड झाले आहेत त्यामुळे त्यांचा व पालकांचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. सर्व अतिथींनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरी भागापेक्षा
माफक दरात सर्व सोयीनी परिपूर्ण असणाऱ्या अकादमीचे कौतुक केले. ग्रामीण भागातून आतापर्यंत २०० अधिकारी घडवलेली अकॅडमी पुढे हाच आकडा कितीतरी पटीने वाढवण्याचे अवाहन विद्यार्थ्यांना केले.
या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून परीक्षेचे स्वरूप, परीक्षेतील जीवघेणी स्पर्धा आणि अकॅडमीमुळे शहरात न जाता कमी पैशात कोपरगाव सारख्या ग्रामीण ठिकाणी तयारी करता येणे शक्य झाल्याचे अधोरेखित केले. हृषीकेश नरोडे यांनी आपण खेड्यातील असून गरीब परिस्थितीतून संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी म्हणजे वरदान असल्याचे प्रतिपादन केले. या अकॅडमी मधील सराव प्रश्नपत्रिकांचा प्रचंड फायदा झाल्याचे देखील सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले. यातील सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील तसेच गरीब शेतकरी तसेच काही मजूर कुटुंबातील आहेत हे विशेष. सत्कार प्रसंगी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राजश्री पिंगळे यांनी आपल्या मधुर वाणीने केले तर आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे संचालक पंकज माळी यांनी आभार मानले.


