Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा!! -स्नेहलताताई कोल्हे

देशाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा!! -स्नेहलताताई कोल्हे

महिला दिनी स्नेहलताताई कोल्हे यांचा ‘सेल्फी विथ लाभार्थी’ उपक्रम!!

कोपरगाव प्रतिनिधी

२१ वे शतक हे महिलांचे आहे. देशाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा आहे. स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. महिलांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊन या स्त्रीशक्तीचा आपण आदर केला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महिला विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा महिलांनी लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ ज्या नागरिकांनी घेतला आहे, त्यांच्यासोबत सेल्फी काढून सुसंवाद साधण्याचा उपक्रम भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सेल्फी विथ लाभार्थी’ या अभियानांतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी भेट देऊन विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांसोबत सेल्फी काढून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘सेल्फी विथ लाभार्थी’ हे अभियान भाजपच्या वतीने देशभरात राबविले जात आहे. भाजपच्या नेत्या तथा केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, अभियानाच्या राष्ट्रीय संयोजिका व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, अभियानाच्या राज्याच्या संयोजिका वर्षा भोसले, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत २७ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरमधून या अभियानाची सुरुवात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचला का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने ‘सेल्फी विथ लाभार्थी’ या अभियानातून केला जात आहे. या अभियानाच्या अनुषंगाने आज जागतिक महिला दिनी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी भेट दिली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  केंद्र व राज्य सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजना, जनधन योजना, श्रावण बाळ योजना, गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांसमवेत मोबाईलद्वारे सेल्फी फोटो काढला. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. 
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारे नरेंद्र मोदी हेच एकमेव पंतप्रधान आहेत. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. सर्वसामान्य महिलांसाठीही केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या जनहितकारी योजनांमुळे सर्वसामान्य महिलांसह उपेक्षित व वंचित घटकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून विकासाला गती देणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले असल्याने त्यांना महिलांच्या समस्यांची चांगली जाण आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येते हे लक्षात घेऊन त्यांनी कोणत्याही महिलेने मागणी केलेली नसताना ११ कोटी स्वच्छतागृह बांधून महिला-मुलींची कुचंबणा दूर केली. ‘हर घर जल’ योजनेद्वारे ११ कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी देणे असो की, ८० कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा योजना लागू करणे असो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा गौरवच केला आहे. महिलांची चूल व धुरापासून मुक्तता करण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेतून दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन पुरवण्यात येत असून, या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना विशेष करून महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनधन योजनेमुळे अपघाती विमा आणि ३०,००० रुपयांपर्यंतचे जीवन संरक्षण दिले जात आहे. याशिवाय सरकारी योजनांचा पैसा थेट या खात्यात जमा होत आहे, असे कोल्हे यांनी सांगितले. 
जागतिक महिला दिनानिमित्त माता-भगिनींना शुभेच्छा देताना स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान आहे. ज्याची कशातच किंमत होऊ शकत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीने स्त्रीला मोठा सन्मान दिला आहे. स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे.   राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यापासून ते स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन अनेक माता-भगिनींनी विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे एक लाख डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यातदेखील आपल्या महिला शक्तीचा समसमान वाटा असणार आहे. मुलींनी स्पर्धेला तोंड देत नवनव्या क्षेत्रातील संधी आजमावण्याची हिंमत बाळगावी, असे आवाहन कोल्हे यांनी केले. 
पंतप्रधान उज्ज्वला योजना, जनधन योजना, श्रावण बाळ योजना, गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांचा आम्हाला खूप फायदा झाला असल्याचे अनेक लाभार्थी महिलांनी स्नेहलताताई कोल्हे यांना यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!