
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये गलथान कारभारावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने दिनांक २५/०२/२०२३ रोजी कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांचेवर आक्षेपार्ह आरोप – करत कोपरगाव येथील शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सदर गुन्हा मागे घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असूनही गैरहजर असलेल्या डॉक्टर व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन, कोपरगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक अभिजीत कालेकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, कोपरगाव तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष किशनभाऊ पवार, तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष आकाश काळे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ वाघ, तालुका संपर्कप्रमुख दत्तात्रय भोसले, आदी सह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी हे कधीही वेळेवर रात्रीच्या वेळेस रुग्णालयात हजर राहत नाहीत. तसेच सदर रुग्णालयामध्ये तक्रार पुस्तीका, हजेरी पुस्तिका ठेवली जात नाही. रात्रीच्या वेळी एखादे रुग्ण सदर रुग्णालयामध्ये उपचाराकामी दाखल झाल्यास एकतर कर्मचारी रूग्णालयाचा दरवाजाच उघडत नाहीत व दरवाजा उघडलाच तर रूग्णांना गुन्हेगाराची वागणूक देऊन रुग्णांना सकाळी येणेबाबतची दमदाटी दिली जाते, अन्यथा खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करून घेणेबाबत बजावले जाते, वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. रात्रीच्या वेळी सर्व कर्मचारी हे कर्तव्यावर हजर नसतात, सदर रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेले कर्मचारी रुग्णालयाचे दरवाजे बंद करून झोपलेले असतात. पोलीस यादी घेऊन उपचारास आलेल्या फिर्यादी रूग्णांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात नाही, फिर्यादी रुग्णास वैद्यकीय प्रमाणपत्र देणेकामी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते व पैसे दिल्यावरच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रात वाढीव जखमा दाखवणेसाठी देखील पैसे मागितले जातात व फिर्यादी रुग्ण सांगतील त्याप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून दिले जाते. असे अनुभव तालुक्यातील नागरिकांना फार वर्षांपासून आहेत. तसेच याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही सदर रुग्णालयातील हा गलथान कारभार थांबलेला नाही.
या सर्व गलथान कारभाराची प्रत्यक्ष अचानक भेट देऊन पाहणी करण्यासाठी व खात्री करण्यासाठी
दिनांक २५/०२/२०२३ रोजी कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे हे पहाटे ०५:०० चे सुमारास सदर प्रकारा बाबतची शहानिशा करण्याकरता व सदर गलथान कारभार हा उघडकीस आणण्याकरीता कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते. रुग्णालयाचा हा गलथान कारभार जनतेच्या समोर येऊ नये व त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होऊ नये, या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी रुग्णालयातील परिचारिकांशी तहसीलदार साहेब यांनी आक्षेपार्ह वर्तणूक केल्याबाबतचा खोटा बनाव करून त्यांचे बदनामीकारक वृत्त प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित करून कर्तव्यदक्ष तहसीलदारांची प्रतिमा मलीन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, जो निषेधार्ह आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या दुष्कृत्यांचा आम्ही तिव्र निषेध करतो.
तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी नाही, सदर रुग्णालयामध्ये हजेरी पुस्तिका उपलब्ध नाही, तक्रार पुस्तिका उपलब्ध नाही, त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही याचा गैरफायदा घेत रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी हे मनमानीपणे कधीही घरी थांबतात, रुग्णालयामध्ये कर्तव्यावर रुजू होत नाहीत, रुग्णांची हेळसांड करतात व शासनाचा फुकट पगार घेतात व गोरगरीब जनतेवर ज्यांना शासकीय रुग्णालयातून उपचारांची गरज आहे अशा जनतेवर अन्याय करतात. कोपरगाव तालुक्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशीच परिस्थिती आहे. रुग्णालयातील कर्मचारी हे राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने त्यांच्या मनमानी कारभारामुळे शासकीय रुग्णालयांना कत्तलखान्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यांचे हे स्वरूप पालटू इच्छिणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जर त्यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले कामी त्रास होणार असेल व कामचुकार वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांना पाठीशी घालून त्यांची पाठराखण करून जनतेच्या पैशांतून जर त्यांना फुकट पोसले जाणार असेल तर आम्ही मंत्रालयासमोर आंदोलनास बसणार आहोत असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
वरिष्ठ स्तरीय समिती नेमून आज पावतो कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाबाबतच्या वरिष्ठ स्तरावर प्राप्त तक्रारींचा संदर्भ घेऊन, दिनांक २५/०२/२०२३ रोजीच्या बनावट प्रकरणाची सखोल चौकशी करून रुग्णालयातील सर्व दोषी कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, जेणेकरून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांमधील अशा प्रकारचे गलथान कारभार बंद होतील व कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांना जनतेला न्याय देता येईल. अशी ही मागणी आपल्या निवेदनात केली आहे.


