
कोपरगाव प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज मंगळवारी (१५ नोव्हेंबर) कोपरगाव येथे माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष देवराम पगारे, अकबरभाई शेख, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, विष्णुपंत गायकवाड, शंकरराव बिऱ्हाडे, दीपक जपे, डॉ. अनिल जाधव, सतीश चव्हाण, धनंजय धनवटे, संजय तुपसुंदर, शुभम पाठक आदी उपस्थित होते.
क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात असामान्य शौर्य गाजवून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासींना संघटित करून आदिवासी समाजात नवचैतन्य जागविण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली, त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा मुंडा यांनी लढा उभारला. आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उपसले. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी उलगुलान चळवळ सुरू केली. बिरसा मुंडा यांनी भारताची जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी आणि परकीयांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. भगवान बिरसा मुंडा यांचा १५ नोव्हेंबर हा जन्म दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदावर काम करण्याची संधी देऊन आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे. आज बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेल्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी उजाळा देऊन त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे स्मरण केले.


