

कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी येथील सर्व्हे नं.८९ मधील रोहित्र तीन महिन्यात दोनदा चोरी गेले आहे, त्यामुळे परिसरातील रब्बी हंगाम अडचणीत आला आहे.
येथील महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते यांच्या ८९ सर्वे नंबर मधुन २५ अश्वशक्तीच्या विद्युत रोहित्रवरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मागील दोन तीन महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज भासत नव्हती. मात्र आता रब्बीचे पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू, हरभरा, कांदा पिकांची लागवड सुरू केली आहे. अशातच चोरट्यांनी थेट विद्युत रोहित्रावरच डल्ला मारल्याने विद्युत पंप बंद झाले आहेत. दोन महिन्यांपुर्वीही हे रोहित्र चोरी गेले होते. दोन महिन्यांत नवीन रोहित्र बसविताच पुन्हा त्यातील वायर, ऑईल आदी साहित्य चोरी गेले आहे. तसेच निरंजन अशोक रोहम, रामभाऊ सुभाषराव आव्हाड, नितीन गायकवाड या शेतकऱ्यांचे विद्युत पंपही चोरीला गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबत मधुकर वक्ते यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, महावितरण अधिकारी शेलार यांना याबाबत अवगत केले आहे.
जेऊर कुंभारी भागात विद्युत पंप, स्टार्टर, वायर, पाईप आदी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू असुन पोलीसांनी या चोरांचा वेळीच बंदोबस्त करत शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी माजी संचालक मधुकर वक्ते यांनी केली आहे.


