Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रलंबित पिटीशनचा निर्णय होईपर्यंत श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त नेमू नका सर्वोच्च...

प्रलंबित पिटीशनचा निर्णय होईपर्यंत श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त नेमू नका सर्वोच्च न्यायालयाचे राज्य शासनाला सक्त निर्देश!!-अॅड. विद्यासागर शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या दिलेल्या निर्णयाला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोप काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन (याचिका) दाखल करून आव्हान दिले होते. त्या याचिकेची दखल घेवून सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले असून तोपर्यंत राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नेमणूक करू नये असे सक्त निर्देश दिले असल्याची माहिती अॅड. विद्यासागर शिंदे यांनी दिली आहे.याबबत सविस्तर वृत्त असे की, २०१९ ला राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली विधी व न्याय विभागाच्या नियमावलीनुसार शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाची नेमणूक केली होती. या मंडळाच्या अध्यक्ष व विश्वस्तांना आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार नसले तरी साई भक्तांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात व श्री साईबाबा संस्थानचे विकासातमक निर्णय घेण्याचे काही निर्णय घेण्याची मुभा होती. त्यामुळे जरी आर्थिक अधिकार नसले तरी विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली संस्थानचा कारभार व्यवस्थित सुरु होता व साई भक्तांना देखील सोयी-सुविधा मिळत होत्या. मात्र मागील काही महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होवून नवीन सरकार स्थापन झाले व सप्टेंबर २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते. त्याबाबत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोप काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची शुक्रवार (दि.०४) रोजी न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या समोर बाजू मांडतांना,  उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून राज्य शासनाला आठ आठवड्याच्या आत नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत येत्या काही दिवसात संपणार असल्यामुळे जर मुदतीच्या आत नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यात आले तर सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत दाखल करणाऱ्या याचिकांना महत्वच राहणार नसल्याचे आ. आशुतोप काळे यांच्या विधी तज्ञांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेवून न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी जानेवारी २०२३ मध्ये या पिटीशन (याचिका) ची सुनावणी घेणार असल्याचे सांगितले व जोपर्यंत या पिटीशन (याचिका) ची अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नेमणूक करू नये असे सक्त निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यशासन श्री साईबाबा संस्थानवर विश्वस्तांची नेमणूक करू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशाने स्पष्ट झाले असल्याचे अॅड. विद्यासागर शिंदे यांनी सांगितले आहे. आ. आशुतोष काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विधी तज्ञ अॅड. शाम दिवान, अॅड.सोमिरण शर्मा व अॅड. विद्यासागर शिंदे यांनी काम पाहीले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!