
कोपरगाव प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणा निमित्त महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पुणतांबा येथे आयोजित राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ बुधवार दि २६ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.
जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, अभिषेक, हस्तलिखित जप साधना, नामसंकीर्तन व पारायण आदी कार्यक्रम शांतीगिरी महाराज यांचा सह विविध संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणारा राष्ट्रनिर्माण सोहळा सोमवार दि २८ नोव्हेंबर ते सोमवार दि ५ डिसेंबर या पर्व काळात पुणतांबा येथे होणार असुन या कार्यक्रमाच्या ध्वजारोहन प्रसंगी स्वामी शांतिगिरीजी महाराज, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, उद्योजक बाबासाहेब काळे यांच्यासह अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी स्वामी शांतिगिरी महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले, की प.पु बाबाजींनी धर्मसंस्कार सोहळ्याच्या माध्यमातून लाखो कुटुंबांमध्ये शिवभक्ती निर्माण केली असून या माध्यमातून लाखो लोक व्यसनमुक्त-रोगमुक्त झालेले आहे त्यामुळे पवित्र तीर्थक्षेत्र पुणतांबा येथे संपन्न होत असलेल्या राष्ट्रनिर्माण सोहळ्याप्रसंगी जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होत अनुष्ठान करावे कारण अनुष्ठान केल्याने शरीर बुद्धी आणि मन याचे शुद्धीकरण होते,तसेच बालपणातच सुसंस्कार मिळतात आत्मशक्ती वाढते व्यसनातून मुक्ती मिळते ज्ञानप्राप्ती व पुण्यप्राप्ती होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होऊन जीवनात सुख शांती व समाधान मिळते त्यामुळे उद्याच्या राष्ट्राचे निर्माते असलेल्या जास्तीत जास्त बाळ गोपाळानी यात सहभागी व्हावे तसेच परिसरातील भाविक भक्त माता भगिनींनी देखील या राष्ट्रनिर्माण सोहळ्यात सहभागी होत राष्ट्रनिर्माणासाठी आपला छोटासा सहभाग नोंदवावा असे आवाहन शांतिगिरी महाराजांनी या प्रसंगी उपस्थित भाविकांना केले.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी १ लाख रुपयांची तर उद्योजक बाबासाहेब काळे यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयाची देणगी जाहीर करत आपला हातभार लावला.



