
कोपरगाव प्रतिनिधी
ऐन सणासुदीच्या काळात कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांना स्वस्त धान्य मिळणे बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत ग्रामपंचायतीला लेखी पत्र दिले आहे.
दिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. राज्य सरकारने दिवाळी सणासाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर मागील काळात मोफत स्वस्त धान्य वितरित करण्यात आले आहे. मात्र तब्बल तीन महिन्यांपासून चांदेकसारे गावात स्वस्त धान्यच वितरित झाले नाही त्यामुळे नागरिकांना स्वस्त व मोफत धान्यापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे येथील संतप्त लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंच पूनम खरात ,उपसरपंच विजय केशवराव होन, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुपेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली व धान्य वितरणात ग्रामपंचायतचा काही संबंध नसल्याने ग्रामपंचायतीमार्फत कोपरगावच्या तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे सरपंच पूनम खरात यांनी याप्रसंगी आश्वासन दिले. याबाबत ग्रामपंचायतने तातडीने तहसीलदार विजय बोरुडे यांना ठराव पाठवून चांदेकसारे गावची स्वस्त धान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी, मागील काळात वंचित राहिलेला स्वस्त धान्य पुरवठा करावा, राज्य सरकारने घोषित केलेले दिवाळी पॅकेज तातडीने देण्यात यावे अशी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.



